एसटी कर्मचारी संपातून महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी माघार घेतल्याची घोषणा केल्यानंतरही हा संप सुरुच आहे. मात्र, आता हा एसटी कर्मचाऱ्यांचा संप नाही तर दुखवटा असल्याचं अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि कामगारांचं म्हणणं आहे. तसंच हा दुखवटा असाच सुरु राहील असा निर्धार कर्मचार्यांनी केला आहे. या संपातून केवळ दोघे बाहेर पडल्याची प्रतिक्रिया सदावर्ते यांनी दिली.
गुणरत्न सदावर्ते म्हणाले, ‘ अजय गुजर आणि त्यांचे फक्त दोन माणसं या दुखवट्यातून बाहेर पडलेली आहेत. त्यामुळे या दुखवट्यावरती कोणताच परिणाम झालेला नाही. जवळपास 92 हजार कर्मचारी पहिल्यांदा एकत्रित आलेले आहेत. अजून देखील ते या दुखवट्यावरती ठाम आहेत. जवळपास 54 एसटी कर्मचाऱ्यांनी आपला जीव याकरता गमावलेला आहे. त्यामुळे राज्यभरातील एसटी कर्मचारी दुखवट्यावर ठाम असून, आजसुद्धा राज्यभरातल्या एसटी संपूर्ण थांबलेल्या आहेत.