कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यात मुंबईतील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. ओमिक्रॉनचे सावट वेगळेच. या साऱ्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत नागरिकांना कोरोना नियम पाळण्याचे आवाहन केले. शिवाय मुंबईत लॉकडाऊन लावणार का, याबाबत सूचक वक्तव्य केले. काय म्हणाल्या पेडणेकर, जाणून घेऊयात.
महापौर म्हणाल्या की, ओमिक्रॉनला घाबरू नका. मात्र, सारे चिंताजनक आहे. लॉकडाऊन असताच कामा नये. आत्ता सगळे सावरतायत. लॉकडाऊनमुळे सर्वांचे कंबरडे मोडले आहे. आपण प्रत्येकाने ठरवले तर लॉकडाऊन टाळता येईल. गर्दी करणार नाही, गर्दीत जाणार नाही, असा निर्धार करा. घरातील सर्वांचे लसीकरण करा. मास्क काढणार नाही. बसमध्ये काय सगळीकडेच नियम पाळेन. मास्क न लावता फिरणार नाही. आपल्यामुळे इतरांचे हाल होणार नाहीत, याची काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी केले. शिवाय 20 हजारांचा आकडा क्रॉस झाला, तर केंद्राच्या नियमानुसार राज्य सरकार आणि महापालिका या नियमांची पूर्तता करेल, असा इशारा त्यांनी लॉकडाऊनबाबत दिला.