दादांच्या अकाली जाण्याने मनावर दु:खाचा डोंगर; सुनेत्रा पवारांचं भावनिक ट्विट
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांच्या अकाली निधनानंतर मनावर दुःखाचा डोंगर कोसळल्याचे ट्वीट केले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत, शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या तत्वांवर निष्ठा ठेवून काम करण्याची प्रतिज्ञा त्यांनी घेतली. पक्षाला सुरक्षित ठेवण्याच्या कर्तव्यभावनेतून हा घाईघाईने शपथविधी झाल्याचे राष्ट्रवादीतील सूत्रांनी सांगितले.
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अजित पवारांच्या अकाली निधनामुळे मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, अजित पवारांनी शिकवलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची बांधिलकी हाच आपला खरा आधार असल्याचे त्यांनी नमूद केले.
शपथ घेताना मन भरून आल्याचे सांगत, अजित पवारांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा जो मंत्र दिला, तोच वारसा आपण पुढे नेत असल्याचे सुनेत्रा पवार म्हणाल्या. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे काम करत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या प्रेमाची साथ हेच आपले बळ असल्याचेही त्यांनी सांगितले.
