गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा बरसायला सुरुवात केली आहे. मध्यप्रदेश आणि विदर्भात जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणात पाण्याचा साठा वाढला आहे. यामुळे हतनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर तापी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
जळगावच्या भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहेत. सततच्या पावसामुळे हतनूर धरण हे पूर्ण भरले आहे. त्यामुळे हतनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. आज (22 जुलै) रात्री 9 च्या सुमारास तापी नदीपात्रात 1,06,122 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. पाण्याचा वाढता प्रवाह लक्षात घेता नदी पात्रात विसर्ग वाढू शकतो. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.