नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढत असल्यामुळे नाशिक शहराला महापुराचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसाने नाशिकच्या ग्रामीण भागात अक्षरशः हैदोस घातला असून सलग होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मनमाड, नांदगाव, मालेगाव, चांदवड, सटाणा, देवळा भागातील सर्वच नदी, नाले, ओढ्यांना पूर आला आहे. जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
नांदगावची शकांबरी, लेंडी, मन्याड, मनमाड शहरातून वाहणारी पांझन, रामगुळणा मालेगावची गिरणा, मोसम यासह इतर नद्यांना पूर आले असून काहींनी तर रौद्ररूप धारण केल्याचे चित्र आहे. या भागातील अनेक रस्ते, छोटे पूल पाण्याखाली गेल्यामुळे गाव, वाड्या, वस्त्यांचा संपर्क तुटला असून शेतात सगळीकडे पाणीच पाणी झाल्यामुळे शेकडो हेक्टरवरील कांदा, कांद्याचे रोप, मका, बाजरी, भुईमूग, कापूस यासह इतर पिकांना मोठा फटका बसला आहे. काही ठिकाणी घरात पाणी शिरल्यामुळे संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले असून गुलाब वादळाच्या रूपाने आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे हजारो नागरिक, शेतकरी संकटात सापडले आहेत पहाटेपासून पाऊस थांबला असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.