मुंबईसह राज्यातील विविध महापालिका, नगरपरिषदा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. केवळ मुंबईच नाही तर महाराष्ट्र जिंकता आला पाहिजे, असे विधान करून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आगामी निवडणुकांतील राजकीय समिकरणाच्या अनुषंगाने शिवसेनेच्या स्वबळाच्या भूमिकेचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ते विक्रोळी येथील सूर्या नगरमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तीन प्रमुख पक्षांनी ही आघाडी बनवून ‘महाविकास’ची सत्ता स्थापन केली आहे. या पार्श्वभूमीवर आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील राजकीय गणिते कशी असणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. याचदरम्यान संजय राऊतांनी आज स्वबळाचा नारा दिला आहे. मुंबईबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रातील निवडणुकांच्या बाबतीत त्यांचे विधान महत्वपूर्ण मानले जात आहे. त्यांच्या विधानामुळे शिवसेना राज्यात स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट होत आहे.