स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. संभाजी छत्रपती यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. तर शिवसेनेने पाठिंबा हवा असेल तर शिवसेनेत या अशी अटच घातली आहे. संभाजी छत्रपतींना आम्ही खूप मदत केली. त्यांच्या प्रत्येक भूमिकेला समर्थन दिला. पण राज्यसभेच्या जागेसाठी उमेदवार देणं हा आमचा प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही उमेदवार देणार आहोत, असं शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे संभाजी छत्रपती यांचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग खडतर झाला आहे. त्यातच भाजपने आपले पत्ते खोलले नाहीत. भाजपने वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याने संभाजी छत्रपती राज्यसभेवर जाणार की नाही? याबाबतचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यामुळे भाजप आगामी काळात काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर दुसरीकडे संभाजी छत्रपती यांनी सर्व आमदारांना पत्रं लिहून पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे.