मुंबई : संजय राऊतांनी अपात्रतेच्या मुद्द्यावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरही हल्लाबोल केला. १६ आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयाला विलंब करणं हा देशद्रोह असल्याचा आरोप करत संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, नार्वेकर कायद्याचे जाणकार आहे. ते शिवसेनेचे वकील होते आणि शिवसेनेच्या माध्यमातून त्यांचे राजकारण पुढे गेलेत. तरीही त्यांना दुर्योधनाच्या बाजूने असाल तर कायद्याची पदवी पेटीत बंद करून ठेवा, अशी टीका संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर केली. सर्वोच्च न्यायालयाने मेलेल्या पोपटाविषयी भाष्य केलं. पोपट मेलाच आहे. फक्त ते विधानसभा अध्यक्षांनी जाहीर करायचंय. मला वाटलं होतं की या सरकारमध्ये एकच शहाणा माणूस आहे, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. बाकी सगळे अतीशहाणे किंवा मूर्ख आहेत. देवेंद्र फडणवीसच असं म्हणत असतील, तर शहाणपणाच्या व्याख्या बदलाव्या लागतील, असे म्हणत संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला लगावला आहे.