Uddhav Thackeray | फेसबुकवरून सरकार चालत नाही म्हणायचे, आता इन्स्टाग्रामवरून देश चालवतात!; उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. कोरोना काळातील सोशल मीडिया संवादाचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी मोदींवर निशाणा साधला. “कोरोना काळात मी फेसबुक लाइव्ह करायचो. त्यावेळी मला उपदेश दिला जायचा की फेसबुकवरून सरकार चालत नाही. मग आता यांच्यावर इन्स्टाग्रामवरून देश चालवण्याची वेळ आली आहे. एवढी यांची हालत खराब झाली आहे,” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीका केली.
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. कोरोना काळातील सोशल मीडिया संवादाचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी मोदींवर निशाणा साधला. “कोरोना काळात मी फेसबुक लाइव्ह करायचो. त्यावेळी मला उपदेश दिला जायचा की फेसबुकवरून सरकार चालत नाही. मग आता यांच्यावर इन्स्टाग्रामवरून देश चालवण्याची वेळ आली आहे. एवढी यांची हालत खराब झाली आहे,” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तरुणांशी संवाद साधत नसल्याचा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला. “पंतप्रधान तरुणांना भेटत नाहीत. मध्यरात्री फ्रेंड्स म्हणून इन्स्टाग्रामवरून संदेश देतात,” असा टोला त्यांनी लगावला. देशातील तरुण आपल्या न्याय आणि हक्कांसाठी आंदोलन करत असताना त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधानांकडे वेळ नसल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही उद्धव ठाकरे यांनी जोरदार निशाणा साधला. “काँग्रेसने एवढ्या शिव्या कधीच खाल्ल्या नव्हत्या, त्या मोदी आणि शाहांच्या वाट्याला आल्या आहेत,” असे ते म्हणाले. तरुणांना भेटण्यासाठी वेळ नसताना मोदी गद्दारांना भेटत असल्याचा आरोप करत त्यांनी नुकत्याच झालेल्या राजकीय भेटीगाठींवरून भाजपला लक्ष्य केले.
अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील फुटीवरूनही टीका केली. “शाह सेना स्थापन करणारे गद्दार पंतप्रधानांना भेटले. त्यांना भेटायला मोदींना वेळ आहे,” असे ते म्हणाले. अमित शाह मुंबईत आले असताना त्यांचे स्वागत गद्दारांनी केल्याचा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर उपरोधिक टीका केली. “मोदींनी गद्दारांना सांगितलं—स्वामी समर्थ म्हणतात भिऊ नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. तसं मोदी नवे स्वामी झाले का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तरुणाईकडून मोदींची निंदा होत असताना ते गद्दारांना “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे,” असा संदेश देत असल्याचे ठाकरे म्हणाले.
गद्दारांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना राजकीय संरक्षण दिले जात असल्याचा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला. “गद्दारांना चिंता कशाची आहे? वॉशिंग मशीनमध्ये गेले, पण गद्दारीचा डाग काही जात नाही,” असा टोला त्यांनी लगावला. देशातील तरुण न्याय आणि हक्कांसाठी आंदोलन करत असताना त्यांना भेटण्याऐवजी राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींना प्राधान्य दिले जात असल्याची टीका त्यांनी केली.
“तरुणांना भाऊ, आजोबा, फ्रेंड्स म्हणून भिऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे, असं सांगायला पाहिजे होतं,” असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तरुणांशी संवादाच्या पद्धतीवरही प्रश्न उपस्थित केला.
उद्धव ठाकरे यांच्या या आक्रमक वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा सत्ताधारी आणि ठाकरे गटामधील आरोप-प्रत्यारोपांना धार आली असून, त्यांच्या या टीकेवर भाजप आणि महायुतीकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
