मुंबई, ९ सप्टेंबर २०२३ | मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या उन्हाळ्यात मुंबईकरांना पाणी टंचाईची समस्या उद्भवणार नाही. कारण मुंबईला पाणी पुरवठा करणारे चार तलाव पाण्याने ओव्हरफ्लो झाले आहेत. मुंबईला पाणी पुरवठा करणारे मोडक सागर तलाव, तानसा तलाव, विहार तलाव आणि तुलसी तलावात 100 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. तर हे चारही तलाव पूर्णपणे भरले आहेत. अप्पर वैतरणा ८७ टक्के, मध्य वैतरणा ९७ टक्के आणि भातसा तलावात ९७ टक्के पाणीसाठी जमा झाला आहे. दरम्यान, हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे या जिल्ह्यांतील अनेक भागांत पुढच्या चार तासांमध्ये मध्यम ते तीव्र स्वरुपांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्यानं केले आहे.