भारतातील सर्वात मोठा बँकिग घोटाळा, स्टेट बँकसहित 28 बँकांना चुना; 22 हजार कोटींचा फेरफार!
एबीजी शिपयार्डच्या विरोधात केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने (CBI) गुन्हा दाखल केला आहे. तब्बल 22 हजार कोटी रुपयांचा आर्थिक फेरफार झाल्याचा ठपका सीबीआयनं ठेवला आहे.
नवी दिल्ली : देशातील आजवरचा सर्वात मोठा बँकिंग घोटाळा (BANKING SCAM) प्रकाशझोतात आल्याचा दावा सीबीआयनं केला आहे. एबीजी शिपयार्डच्या विरोधात केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने (Central Bureau of Investigation) गुन्हा दाखल केला आहे. तब्बल 22 हजार कोटी रुपयांचा आर्थिक फेरफार झाल्याचा ठपका सीबीआयनं ठेवला आहे. एबीजी शिपयार्ड (ABG SHIPYARD) आणि त्यांच्या संचालकांच्या विरोधात तब्बल 28 बँकांसह 22,842 कोटींच्या आर्थिक फेरफार प्रकरणी प्राथमिक गुन्ह्याची नोंद केली आहे. एबीजी शिपयार्ड जहाज बांधणी आणि जहाज देखभाल क्षेत्रातील आघाडीची कंपनी मानली जाते. कंपनीचे शिपयार्ड गुजरात राज्यातील दहेज आणि सूरत राज्यांत आहे. एबीजी शिपयार्ड आणि त्यांचे संचालक ऋषी अग्रवाल, संथनम मुथुस्वामी आणि अश्विनी अग्रवाल यांच्याविरोधात 22 हजार कोटी रुपयांच्या फेरफार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
28 बँका, 22 हजार कोटी :
सीबीआयला 8 नोव्हेंबर, 2019 मध्ये पहिली तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर वर्षभर छाननी करुन सीबीआयने याबाबतची पहिली तक्रार दाखल केली आहे. शिपयार्डच्या बँक घोटाळ्याच्या जाळ्यात एसबीआय, आयसीआयसीआय, बँक ऑफ बडौदा, पीएनबी आदी बँकांचा समावेश आहे. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने स्टेट बँकेकडून 2925 कोटी, ICICI कडून 7089 कोटी, IDBI कडून 3634 कोटी, बँक ऑफ बडौदा कडून (BOB) 1614 कोटी, PNB कडून 1244 कोटी आणि IOB कडून 1228 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते.
घोटाळा वाढता वाढे :
सीबीआयने शिपयार्ड घोटाळ्याची व्याप्ती अधिक असल्याचं म्हटलं आहे. घोटाळ्याच्या संबंधित सर्व कागदपत्रांची छाननी केली जात आहे. यापूर्वी नीरव मोदीचा पंजाब नॅशनल बँकेसोबतचा 14 हजार कोटी रुपयांचा घोटाळा समोर आला होता. आतापर्यंत नीरव मोदीची भारतातील आणि भारताबाहेरील संपत्ती गोठविण्यात आली आहे. सध्या लंडनहून नीरव मोदीच्या भारतात प्रत्यार्पणासाठी प्रयत्न केले जात आहे. उद्योजक विजय माल्याचा (Vijay Mallya) तब्बल 9 हजार कोटींचा बँक घोटाळा चर्चेत आला.
एबीजी शिपयार्ड विषयी :
एबीजी शिपयार्ड लिमिटेड ही एबीजी ग्रूप कंपनीचा भाग आहे. वर्ष 1985 मध्ये कंपनीची स्थापना करण्यात आली होती. एबीजीचे मुख्यालय सध्या मुंबईत आहे. गुजरात राज्यातील सूरत आणि दहेज मध्ये जहाजबांधणीची कामे केली जातात. एबीजी ही भारतातील सर्वात मोठी खासगी जहाजबांधणी कंपनी मानली जाते. तब्बल 20 टन वजनाच्या जहाज निर्मितीची क्षमता एबीजीकडे आहे.
इतर बातम्या :