अन् मुली पळून गेल्यावर काय करायचे? सोने खरेदीवरून महिलांची भीती आणि सवाल
पंतप्रधान मोदींच्या वर्षभर सोने खरेदी न करण्याच्या आवाहनावर महिलांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. लग्नासाठी सोन्याशिवाय कसे चालेल, मुली पळून जातील अशी भीती महिलांना वाटते आहे. सोन्याच्या वाढत्या किमती कमी करण्याची मागणीही होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभर सोनं खरेदी न करण्याचं आवाहन देशातील जनतेला केलं आहे. त्यामुळे देशभरातून नागरिकांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. आखाती देशातील परिस्थितीमुळे देशहितासाठी काही निर्णय घेणं आवश्यक असल्याचं काही लोकांचं म्हणणं आहे. तर काहींनी मात्र या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. अशा निर्णयामुळे मुलींची लग्न रखडतील. त्यामुळे मुली पळून जाऊन लग्न करतील, अशी भीती महिलांनी व्यक्त केल्या आहेत.
सोलापूरमध्ये पंतप्रधानांच्या आवाहनावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही महिलांनी आपल्या मनातील खदखद, संताप आणि भीती व्यक्त केली आहे. लग्नासाठी सोनं खरेदी करावे लागते. सोनं नसेल तर सून घरात येत नाही. आणि वर्षभर लग्न नाही केले, तर मुली पळून जातील. मुली पळून गेल्यावर काय करायचे?, असा सवाल महिलांनी केला आहे. मुलीचे लग्न ठरल्यावर जावयाला चार-पाच तोळे सोने द्यावेच लागते. सोनं नाही दिलं तर मुलींचे लग्न कसे होणार? असा सवालही या महिलांनी व्यक्त केला आहे.
किंमती कमी करा
पंतप्रधानांनी आव्हान केले असले तरी मुळात सोनं इतकं महाग आहे की ते आम्ही खरेदी करू शकत नाही. पंतप्रधानांनी सोन्याच्या किमती कमी केल्या पाहिजेत, अशी मागणी या महिलांनी केली आहे. तर काही महिलांच्या मते, पंतप्रधानांनी आवाहन केले असेल तर त्यांनी काहीतरी विचार करूनच केले आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी आवाहन केल्याने आम्ही सोने खरेदी करणार नाही, असं या महिला म्हणाल्या.
मग चांदीचे दागिने घालावे का?
अमरावतीतील सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मात्र वेगळाच प्रश्न पडला आहे. लग्नात सोन्याचे नाही तर मग चांदीचे दागिने घालावे का? मोदींच्या आवाहनावर अमरावतीमधील महिलांनी अशा प्रकारे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लग्न समारंभामध्ये सोनं खरेदी करावेच लागते. त्याशिवाय लग्न समारंभ होत नाही. जे लोक गुंतवणूक करतात त्यांनी थांबलं तर हरकत नाही. परंतु ज्यांच्या घरी लग्न आहे त्यांना घ्यावं लागतं, असं या महिलांचं म्हणणं आहे.
हौस पूर्ण करणार
जळगावमधील महिलांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मोदींनी घेतलेल्या निर्णय चांगला असून अंमलात आणू असे म्हणत काही महिलांनी मोदींच्या निर्णयाचे स्वागत करू असे म्हटलं आहे. तर, सोन खरेदी केलं नाही तर महिलांसाठी खूप अवघड होईल, असे काही महिलांनी म्हटलं असून त्यांनी मोदींच्या आवाहनाकडे पाठ फिरवली आहे. तर काही महिलांनी खरेदी करणार की नाही यावर उत्तर न देता सोन्याच्या वाढलेल्या भावावर नाराजी व्यक्त केली आहे. बजेटमध्ये का होईना पण हौस पूर्ण करण्यासाठी सोने खरेदी करणार असल्याचेही महिलांकडून सांगण्यात येतंय.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील वर्षभर सोने खरेदी करू नका, असे आवाहन देशवासीयांना केलं आहे. मात्र पुण्याच्या ग्रामीण भागात अद्याप तरी मोदींच्या आवाहनाचा विशेष परिणाम झालेला दिसत नाहीये. लग्न सराई त्याचबरोबर काय दिवसात धोंड्याचा महिना सुरू होणार असल्याने सोन्याच्या दुकानात अजूनही ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे.
एक सोन्याचा दागिना घडविण्यामागे 6 ते 7 कारागिरांचा हात असतो. त्यामुळे मोदींनी जरी देशासाठी हे आवाहन केलं असलं तरी. याचा कारागिरांबरोबरच व्यवसायावरही परिणाम होईल. पण मोदींनी केलेल्या आवाहनाचा ग्रामीण भागात अजून तरी विशेष काही परिणाम झालेला नाही, असे सराफ व्यवसायिकांनी म्हटलंय. मोदींच्या आवाहनामुळं आम्ही सर्वसामान्य जनता घाबरून गेलेली आहे. ह्या आठवड्यात धोंड्याचा महिना सुरू होत आहे, त्यामुळे जावयाला काय द्यायचं याचं टेन्शन वाढलं आहे. आताच सोनं घेणं अवघड झालेल आहे. जर एका वर्षात भाव वाढ झाली तर आमच्यासारख्या सर्वसामान्यांनी काय करावे? अशी प्रतिक्रिया ग्राहक व्यक्त करत आहेत.
