India Oil Update : ऑइल इंडियाला सलाम, राजस्थानच्या वाळवंटात जे अशक्य वाटलं ते देशासाठी करुन दाखवलं, तेल उत्पादनात चांगली बातमी
India Oil Update : सध्या जगासमोर ऊर्जा संकटाची स्थिती आहे. अनेक देशात लॉकडाऊन लागला आहे. मध्य पूर्वेतील युद्धामुळे तेल आणि गॅस मिळवताना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतोय. या कठीण काळात भारताच्या ऑइल इंडियाने तेल उत्पादनात ते करुन दाखवलय, जे अशक्य वाटत होतं.

मध्य पूर्वेत सुरु असलेल्या युद्धामुळे सध्या सगळ्या जगात तेल संकट निर्माण झालं आहे. इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुजची वाट अडवून धरलीय. त्यांची परवानगी घेऊनच या मार्गावरुन जलवाहतूक सुरु आहे. तेल मिळत नसल्याने काही देशात लॉकडाऊन सारखे निर्बंध लावण्याची वेळ आलीय. जगातील 20 टक्के तेल वाहतूक स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधून चालते. दिवसेंदिवस हे युद्ध भीषण होत चाललं आहे. इस्रायल-अमेरिकेला उत्तर देण्यासाठी इराणकडून आखाती देशांमधील ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले सुरु आहेत. त्यामुळे तेल उत्पादन बाधित झालय. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती वाढत चालल्या आहेत. भारताची ऊर्जा गरज मोठी आहे. भारत तेल आणि गॅससाठी आखाती देशांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.
मध्य पूर्वेतील ही तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता भारताने आता अन्य पर्यायांचा शोध सुरु केला आहे. अमेरिकेने तेल खरेदीवरील निर्बंध शिथिल केल्यामुळे भारताने रशिया आणि इराण या देशांकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी केली आहे. या दरम्यान आता तेलाच्या आघाडीवरुन भारतासाठी एक चांगली बातमी आहे. राजस्थानात थारच्या तप्त वाळवंटात ऑइल इंडिया लिमिटेडने कच्चा तेलाच्या उत्पादनाचा एक नवीन रेकॉर्ड केलाय. यामुळे देशाची ऊर्जेची गरज पूर्ण होणारच आहे. पण परदेशी तेलावरील अवलंबित्व सुद्धा कमी होणार आहे. राजस्थानात बीकानेर-नागौर भागात बागेवाला फील्ड येथे भारताच्या तेल विहिरी आहेत. तिथून चांगले रिझल्ट मिळाले आहेत.
या ऑइल फिल्डमध्ये भारताचं किती तेल उत्पादन सुरु आहे?
अधिकृत आकड्यांनुसार आता जोधपुर सँडस्टोन फॉर्मेशनमधून प्रतिदिन 1,202 बॅरल कच्चा तेलाचं उत्पादन सुरु आहे. मागच्यावर्षीय याच ऑइल फिल्डमधून दरदिवसाला 705 बॅरल कच्चा तेलाचं उत्पादन सुरु होतं. आता त्यात जवळपास 70 टक्के वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मधील वार्षिक उत्पादनावर नजर टाकल्यास इथून 43,773 मेट्रिक टन कच्च तेलं काढण्यात आलं. मागच्यावर्षी हे उत्पादन 32,787 मेट्रिक टन होतं. जमिनीतून हे तेल काढल्यानंतर या कच्चा तेलाला टँकर्सच्या माध्यमातून गुजरातच्या मेहसाणा येथील ओएनजीसी प्लांटमध्ये नेलं जातं. तिथून पाइपलाइ मार्गे आयओसीएलच्या कोयली रिफायनरीपर्यंत हे तेलं आणलं जातं. तिथून या तेलावर रिफायनिंगची प्रोसेस केली होती. म्हणजे वापरायोग्य हे तेल बनवलं जातं.
भारताकडून नव्या टेक्नोलॉजीचा वापर
थारच्या वाळवंटात भू-वैज्ञानिक स्थिती खूप कठीण आहे. इथे मिळणारं कच्च तेलं सामान्य तेलाप्रमाणे तरल नसतं. खूप चिकट आणि घट्ट असतं. हे तेल जुन्या पद्धतीने काढणं जवळपास अशक्य होतं. मग, ऑइल इंडियाने सायक्लिक स्टीम स्टिमुलेशन ही अत्याधुनिक थर्मल एन्हांस्ड ऑइल रिकवरी टेक्निकचा वापर केला. 2018 साली फक्त ट्रायल झालेली. पण आता CSS टेक्निक उत्पादनाचा कणा बनली आहे. भारताच्या हेवी ऑइल सेक्टरमध्ये कंपनीने प्रथमच फिशबोन ड्रिलिंग आणि बेयरफुट कंप्लीशन सारख्या अत्याधुनिक टेक्नोलॉजीचा वापर केला. सोबतच डायल्यूएंट इंजेक्शन, इलेक्ट्रिक डाऊनहोल हीटर्स आणि हाय टेम्परेचर थर्मल वेलहेड्स वापर करुन कठीण उत्पादन प्रक्रिया अधिक सोपी केली.
बागेवाला फील्डचा शोध कधी लागला?
वर्ष 1991 मध्ये बागेवाला फील्डचा शोध लागला होता.200.26 वर्ग किलोमीटरच्या विशाल एरियामध्ये ही ऑइल फिल्ड पसरली आहे. 2017 साली इथून तेल काढण्याचं काम सुरु झालेलं. या फिल्डमध्ये 52 तेल विहिरी आहेत. यात 33 विहिरी सक्रीय आहेत. उत्पादनाचा हाच वेग कायम ठेवण्यासाठी कंपनीने या वर्षी 19 तेल विहिरींमध्ये CSS ऑपरेशन यशस्वीरित्या केलं. त्याशिवाय 13 विहिरी अजून खोदण्यात आल्या आहेत.
