Uday Kotak : वाईटासाठी तयार रहा, प्रसिद्ध बँकर उदय कोटक यांचा मोठा इशारा, अर्थव्यवस्थेबाबत सरकारला मोलाचा सल्ला
Uday Kotak : "अमेरिका-इराण युद्धाचा परिणाम आतापर्यंत भारतीय ग्राहकांवर झाला नव्हता. याचं कारण म्हणजे जुना स्टॉक आणि तेल कंपन्या नुकसान उचलत होत्या. पण आता मोठा झटका येतोय"

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन दिवसांपूर्वी देशवासियांना पेट्रोल-डिझेल जपून वापरण्याचं, वर्षभर सोनं खरेदी न करण्याचं आणि WFH चं आवाहन केलं होतं. पंतप्रधान मोदींच्या या आवाहनानंतर देशात सगळेच सावध झाले आहेत. येणाऱ्या दिवसात ऊर्जा संकट स्थिती अजून गंभीर होण्याचे हे संकेत मानले जात आहेत. मोदींच्या आवाहनामागे अमेरिका-इराण युद्धाची पार्श्वभूमी आहे. मागचे दोन महिने अमेरिका-इराण युद्धाची झळ आपल्याला पोहोचली नाही. पेट्रोल-डिझेलचे भाव सरकारने स्थिर ठेवले. पण आता या युद्धावर कुठलाही तोडगा दिसत नाहीय. पुन्हा एकदा हे युद्ध सुरु होऊ शकतं किंवा आहे तीच परिस्थिती राहिल. स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधून जलवाहतूक जवळपास ठप्पच आहे. जगातील हा एक महत्वाचा तेल मार्ग आहे. जगातील 20 टक्के तेलाची वाहतूक हॉर्मुजमधून होते. भारताचं कच्चं तेल, गॅस मोठ्या प्रमाणात याच मार्गावरुन येतं. त्यामुळे येणाऱ्या दिवसात पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये मोठी वाढ होऊ शकते. या पार्श्वभूमीवर मोदींनी हे आवाहन केलय.
आता वित्तीय क्षेत्रातील मोठं नाव असलेल्या उदय कोटक यांनी सुद्धा देशवासियांना सावध केलं आहे. “ऊर्जा शॉक आणि बदलत्या भू-राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने बदलासाठी तयार असलं पाहिजे. अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय कंपन्यांनी दीर्घकालीन राष्ट्रीय मजबुतीच्या दृष्टीने विचार केला पाहिजे” असं उदय कोटक म्हणाले. मध्य पूर्वेत युद्ध सुरु असूनही मागच्या दोन महिन्यात आपण ऊर्जा किंमतीची झळ सोसलेली नाही असं उदय कोटक म्हणाले. दिल्लीत सीआयआयच्या वार्षिक उद्योग परिषदेत ते बोलत होते.
कुठल्या कुटुंबांना सर्वात जास्त फटका?
“खासकरुन कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी इंधनाच्या वाढत्या किंमती आणि महागाईचा सामना करणं एक आव्हान असेल” असं उदय कोटक म्हणाले.
उदय कोटक यांनी काय सल्ला दिला?
आपण वाईटासाठी तयार असलं पाहिजे असं उदय कोटक म्हणाले. “भारत मोठ्या प्रमाणात तेल आयातीवर अवलंबून आहे. भारत गरजेच्या 85 टक्के तेल आयात करतो. त्याचा अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे महागाई वाढते, रुपया ढासळतो आणि आर्थिक स्थिरता हलते” असं उदय कोटक म्हणाले. प्रति बॅरल कच्चा तेलाच्या किंमती 100 डॉलरच्या वर राहिल्या तर भारताची चालू खात्यातील तूट आणखी वाढेल. भारताने आपल्या अर्थव्यवस्थेला कॉर्पोरेट बॅलेन्स शीट सारखं मॅनेज करावं असा सल्ला त्यांनी दिला. अनावश्यक खर्च कमी करावे, एकप्रकारे त्यांनी पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचं समर्थन केलं.
