मुंबईजवळील शहरात तब्बल 4 कोटींचा महाघोटाळा, 100 हून अधिक कुटुंब कंगाल, नेमकं काय घडलं?
या घोटाळ्याप्रकरणी ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने (EOW) चार मुख्य आरोपींना अटक केली आहे. तर अन्य चार आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे. या प्रकरणी फसवणुकीची एकूण रक्कम ४ ते ५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.

जास्त आणि आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून डोंबिवलीतील १०० हून अधिक सामान्य गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या फिनिक्स इन्व्हेस्टमेंट’ (Phoenix Investment) प्रकरणाचा अखेर पर्दाफाश झाला आहे. या घोटाळ्याप्रकरणी ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने (EOW) चार मुख्य आरोपींना अटक केली आहे. तर अन्य चार आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे. या प्रकरणी फसवणुकीची एकूण रक्कम ४ ते ५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं काय घडलं?
‘फिनिक्स इन्व्हेस्टमेंट’ (Phoenix Investment) आणि ‘फिनिक्स फायनान्शियल सोल्युशन एल.एल.पी.’ (Phoenix Financial Solution LLP) या नावाखाली भागीदारी संस्था सुरू करून आरोपींनी हा घोटाळा रचला. गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर मोठा नफा आणि आकर्षक बोनस स्कीम्सचे खोटे आश्वासन दिले गेले. सुरुवातीच्या काळात काही गुंतवणूकदारांना थोडाफार नफा देऊन त्यांनी मोठ्या प्रमाणात लोकांचा विश्वास संपादन केला. विश्वास बसल्यानंतर लोकांनी मोठ्या रकमा गुंतवल्या, पण नंतर आरोपींनी मूळ रक्कम आणि कोणताही परतावा देणे पूर्णपणे थांबवले.
गुंतवणूकदारांची फसवणूक मोठ्या प्रमाणावर झाल्याने या संदर्भात डोंबिवली पोलीस ठाण्यात सुमारे ८० हून अधिक तक्रारी दाखल झाल्या होत्या. फसवणुकीची रक्कम कोट्यवधींच्या घरात गेल्याने या गुन्ह्याचा तपास ठाणे EOW कडे वर्ग करण्यात आला. EOW च्या टीमने तांत्रिक आणि भौतिक पुराव्यांच्या आधारे तपास करून या चार मुख्य आरोपींना अटक केली. गौरव भागत, विकीन पाटणे, देवेंद्र तांबे आणि अमोल तायडे अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
आमिषाला बळी पडू नका, पोलिसांचे आवाहन
अटक केलेल्या आरोपींना कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या आरोपींना ६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीदरम्यान आरोपींकडून घोटाळ्यातील रकमेचा तपशील, ती कुठे गुंतवली किंवा वळवली गेली याचा तपास केला जाईल. अद्याप या घोटाळ्यातील अन्य चार आरोपी फरार आहेत. EOW च्या टीम्स त्यांचा कसून शोध घेत आहेत. पोलिसांकडून गुंतवणूकदारांना अशा जास्त परताव्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या घोटाळ्यामुळे डोंबिवलीतील अनेक सामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना आर्थिक फटका बसला आहे.
