ग्रामपंचायत निधीत गोलमाल ! कामे केली नाहीत, पण कागदोपत्री दाखवली, लाखो रुपयांचा निधी नेमका कुणाच्या घशात?
हिंगोलीच्या औंढानागनाथ तालुक्यातील काकडधाबा येथे आजी-माजी सरपंच आणि ग्रामसेवकांनी मिळून भष्टाचाराचा कळस ओलांडला आहे.
हिंगोली : हिंगोलीच्या औंढानागनाथ तालुक्यातील काकडधाबा येथे आजी-माजी सरपंच आणि ग्रामसेवकांनी मिळून भष्टाचाराचा कळस ओलांडला आहे. त्यांनी गावाला मिळालेला लाखो रुपयांच्या निधीचा उपयोग कागदोपत्री दाखवून प्रत्यक्षात मात्र कामेच केली नसल्याची तक्रार गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. विशेष म्हणजे या भ्रष्टाचारामुळे सरपंच आणि ग्रामसेकांमुळे गेल्या पाच वर्षांपासून गावाला प्रचंड हाल सोसावे लागले आहेत. गावात नाले नसल्याने रस्त्याचे पाणी थेट गावकऱ्यांच्या घरात शिरत आहे.
25 लाख 60 हजारांचा निधी मिळवला, पण…
गेल्या पाच वर्षात 14 व्या वित्त आयोगातून ‘आमचं गाव, आमचा विकास’ या उपक्रमाच्या माध्यमातून गावासाठी 25 लाख 60 हजारांचा निधी मिळाला होता. मिळालेल्या निधीतून दलित वस्ती गावातील विद्युतीकरनासाठी 63 हजार 980 रुपये तर हातपंप दुरुस्ती, पाणी शुद्धीकरण यंत्र, पाणी पुरवठा योजनेवर 4 लाख 91 हजार 864 रुपयांचा खर्च करण्यात आल्याचं कागदोपत्री सांगण्यात आलं आहे. प्रत्यक्षात मात्र, गावातील अर्ध्यापेक्षा अधिक हातपंप बंद अवस्थेत आहेत. तसेच खांब्यावर लावण्यात आलेले लाईट अजून सुरूच झाले नसल्याच गावकरी सांगत आहेत.
अंगणवाडीची दुरावस्था
मिळालेल्या निधीतून 25 टक्के निधी शिक्षणाकारीता खर्च करावा, असा शासन निर्णय आहे. पण केवळ 5 टक्के निधी शिक्षणावर खर्च केला गेला आहे. हा निधी शाळा दुरुस्ती,अंगणवाडीचं शौचालय बांधकाम आणि आंगणवाडीच्या वस्तू खरेदी करिता खर्च केला असल्याच ग्रामसेवकांनी म्हटलंय. मात्र प्रत्यक्षात केलेल्या कामांची माहिती घेतली असता चक्क ग्रामपंचायतीच्या जागेत आंगणवाडी शाळा भरवली जात असल्याचं गावकरी सांगत आहेत. पण येथे ना फरशी आहे ना दुरुस्ती, अंगणवाडी गळत असल्याने चक्क अंगणवाडीवर कार्पेट टाकले आहे. येथे पाणी साचलं आहे तर शौचालयाची अवस्था न विचारलेलीच बरी, अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली.
अपंगांच्या नावानेही पैसे उकळले
शासननिर्णयानुसार 14 व्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीपैकी 5 टक्के निधी अपंगासाठी खर्च करावा, असे स्पष्ट आदेश असतांना मात्र अशी कुठलीही रक्कम मिळत नसल्याचं येथील नागरिक सांगतात. मात्र, अपंगास निधी वाटप केल्याचे ग्रामसेवक दावा करत आहेत. त्यामुळे उचललेला निधी कोणाच्या घश्यात गेला याचा देखील शोध लागणं गरजेच आहे.
माजी सरपंच, ग्रामसेवकांचा प्रतिक्रिया देण्यास नकार
या संदर्भात औंढा नागनाथ येथील गट विकास अधिकारी मनोहर खिल्लारी यांना विचारणा केली असता त्यांनी जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकार यांना चौकशीचा अहवाल सादर केला असे सांगत हात वर केले. आता जिल्हा परिषेदेचे मुख्यकार्यकारी अधिकरी यांनी सदर प्रकरणात लक्ष घालून भ्रष्ट कारभाऱ्यांवर कार्यवाही करून काकडधाबा येथील ग्रामस्थांना न्याय देण्याची गरज आहे. दरम्यान, या प्रककणावर आम्ही ग्रामसेवक आणि माजी सरपंच यांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिला.
हेही वाचा :