सासरच्या मंडळींना झोपेच्या गोळ्या दिल्या, रात्रभरात दागिने-पैशांसह नववधूचा पोबारा
सुरेशकुमारने आपल्यापेक्षा वयाने दहा वर्षांनी मोठ्या असलेल्या छत्तीसगडमधील एका तरुणीशी त्याने कोर्टात लग्न केले. त्याने लग्नासाठी दलालांना 70 हजार रुपयेही दिले होते. लग्नानंतर तिने कुटुंबीयांचं मन आणि विश्वास जिंकला. परंतु लग्नाच्या काही दिवसांतच नवरदेव आणि त्याच्या कुटुंबाला झोपेच्या गोळ्या खायला देऊन दरोडेखोर नववधू दागिने आणि पैशांसह पळून गेली.
चंदिगढ : हरियाणामध्ये इतर राज्यांतून वधू आणण्याचे प्रकरण नवीन नाही. बाहेरच्या राज्यांतून लग्न करुन तरुणींना आणून या नववधूंच्या माध्यमातून नवरदेवाला लुटणारी टोळी सक्रिय झाली आहे. लग्नानंतर अवघ्या काही दिवसात सासरच्या मंडळींना झोपेच्या गोळ्या देऊन दरोडेखोर नववधू सोन्याचे दागिने आणि पैशांसह परागंदा झाली.
नेमकं काय घडलं?
हरियाणा राज्यातील रोहतकमध्ये बोहर गावातही अशीच घटना उघडकीस आली आहे. पीडित सुरेशकुमार दलालांच्या बोलण्यात सर्वस्व गमावून बसला. सुरेशकुमारने आपल्यापेक्षा वयाने दहा वर्षांनी मोठ्या असलेल्या छत्तीसगडमधील एका तरुणीशी त्याने कोर्टात लग्न केले. त्याने लग्नासाठी दलालांना 70 हजार रुपयेही दिले होते. लग्नानंतर तिने कुटुंबीयांचं मन आणि विश्वास जिंकला. परंतु लग्नाच्या काही दिवसांतच नवरदेव आणि त्याच्या कुटुंबाला झोपेच्या गोळ्या खायला देऊन दरोडेखोर नववधू दागिने आणि पैशांसह पळून गेली.
रोकड आणि दागिन्यांची लूट
पीडित नवरदेव आपली तक्रार घेऊन पोलीस स्टेशनला गेला. सुरुवातीला बायकोची दोन-तीन दिवस वाट पाहण्याचा सल्ला पोलिसांनी त्याला दिला. मात्र आईच्या ऑपरेशनसाठी जमा केलेले 70 हजार रुपये आणि तिच्यासाठी बनवलेले काही दागिने लुटून नववधू पळून गेल्याचं त्याने सांगितलं. आता त्याचं पूर्ण कुटुंब धक्क्यात आहे.
दहा वर्षांनी मोठ्या तरुणीशी विवाह
पीडित सुरेश कुमारने सांगितले की त्याने तीन महिन्यांपूर्वी छत्तीसगडमधील आरती या मुलीशी कोर्ट मॅरेज केले होते, जी त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी होती. लग्नासाठी त्याने 70 हजार रुपये दलालाला दिले होते. लग्नाच्या तीन महिन्यांनंतर तिने कुटुंबीयांना झोपेच्या गोळ्या देऊन पैसे आणि दागिन्यांसह पोबारा केला. त्याने आईच्या ऑपरेशनसाठी 70 हजार रुपये जमा केले होते. तिने परत यावे, आपल्याबरोबर राहावे किंवा न्यायालयात घटस्फोट द्यावा, असे सगळे पर्याय त्याने आरोपी बायकोसमोर ठेवले आहेत.
शेजाऱ्यांमध्ये बदनामी
सुरेशच्या कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की शेजार-पाजाऱ्यांमध्ये त्यांची बदनामी होत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे टोमणे ऐकायला मिळत आहेत. आम्हाला शंका आहे की ती आधीच विवाहित होती. लग्नाच्या बहाण्याने दलाल हरियाणातील निरपराध तरुणांची फसवणूक करत आहेत.
राजस्थानमध्ये तरुणीचा डझनभर मुलांशी विवाह
दुसरीकडे, राजस्थानच्या चित्तौडगढमध्ये राहणाऱ्या एका तरुणीने एक-दोन नव्हे तर डझनभर मुलांशी विवाह रचला. पोलिसांनी या रॅकेटचा भांडाफोड केला, मात्र तिने नेमकी किती जणांची फसवणूक केली, याची अद्याप मोजदाद नाही. धक्कादायक म्हणजे तरुणीचा प्रताप तिच्या आई-वडिलांना माहितही नव्हता. नेहा असे आरोपी तरुणीचे नाव असून पोलिसांनी तिच्यासह तिच्या साथीदार सीमा शेख आणि लक्ष्मी यांनाही पकडलं आहे. पोलीस या सर्वांची चौकशी करत आहेत.
लग्नाच्या नावावर फसवणूक करणाऱ्या या टोळीचा भांडाफोड तेव्हा झाला, जेव्हा स्वतः नेहाने तिच्या आईसोबत पोलीस स्टेशनला जाऊन सीमा शेख, साबीर खान आणि लक्ष्मी यांच्याविरुद्ध तक्रार केली. तिघांनी आपले अपहरण केले होते, मात्र मोठ्या कष्टाने आपण त्यांच्या तावडीतून निसटल्याचं तिने पोलिसांना सांगितलं. पण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला, तेव्हा नेहाच त्यांच्या टोळीची सूत्रधार निघाली. सीमा शेख, साबीर खान आणि लक्ष्मी तिचे साथीदार असल्याचे आढळले.
संबंधित बातम्या :
8 नवऱ्यांसोबत सप्तपदी, नवव्या लग्नासाठी सावजाचा शोध, ‘दरोडेखोर’ वधू निघाली एड्सग्रस्त
नवरी बारा वेळा बोहल्यावर चढली, बाराव्या ‘सासरी’ अशी अडकली नि पोलिसांनी ठोकल्या बेड्या
उस्मानाबादेत लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू दागिन्यांसह पळाली, नांदेडमध्ये बेड्या