काळ आला होता पण… चहा पिण्यासाठी कारमधून उतरले अन्…
नातेवाईकांकडे गेलेले कुटुंब मालेगावकडे परत जात असताना जळगावचोंडीजवळ ही भयानक घटना घडली.
मालेगाव/मनोहर शेवाळे (प्रतिनिधी) : देव तारी, त्याला कोण मारी… काळ आला होता पण वेळ आली नव्हती, या म्हणींचा प्रत्यय मालेगावमध्ये आला आहे. मालेगाव मनमाड रोडवर असलेल्या जळगावचोंडी या गावातील एका कुटुंबासोबत ही धक्कादायक घटना (Incident) घडली आहे. चहा पिण्यासाठी कार (Car)मधून उतरताच भरधाव वेगाने जाणारा एक ट्रक (Truck) कारवर पलटी होऊन कार त्याखाली पूर्ण दाबली गेली. नशीब बलवत्तर होते म्हणून संपूर्ण कुटंब (Family) वाचल्याची चमत्कारिक ही घटना पुणे-इंदौर महामार्गांवर घडली.
अपघातात कारचा चक्काचूर
या घटनेत कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. जर कारमधून सर्व जण उतरले नसते तर एकही जण वाचला नसता. नातेवाईकांकडे गेलेले कुटुंब मालेगावकडे परत जात असताना जळगावचोंडीजवळ ही भयानक घटना घडली.
कार रस्त्याच्या कडेला उभी करुन चहा पिण्यासाठी गेले होते कुटुंबीय
जवळकोंडीजवळ चांगला चहा मिळतो म्हणून चहा पिण्यासाठी हे कुटुंबीय तेथे थांबले होते. कार रस्त्याच्या कडेला उभी करुन सर्वजण चहा पिण्यासाठी गेले होते. याचदरम्यान मागून प्लास्टिकचा कच्चा माल घेऊन पुण्याकडे जाणारा ट्रक भरधाव वेगात येत होता.
वाहनावरील नियंत्रण सुटले अन् ट्रक कारवर आदळला
या ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक थेट कारवर जाऊन आदळला आणि कारचा चक्कचूर झाला. हे भयानक दृश्य पाहून कारमधून उतरलेल्या कुटुंबाचा थरकाप उडाला. केवळ दैव बलवत्तर होते म्हणून सर्वजण वाचले आहेत.