अनपेक्षित… धक्कादायक… मोदींच्या ‘या’ केंद्रीय मंत्र्यांना मतदारांनी दाखवला घरचा रस्ता
महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसला आहे. कारण गेल्या निवडणुकीत तब्बल 22 जागा जिंकणाऱ्या भाजपला यावेळी केवळ 9 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील दोन केंद्रीय मंत्र्यांना जनतेने घरचा रस्ता दाखवला आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर देशभरात असाच काहीसा निकाल जनतेने दिला आहे. जनतेने मोदींच्या कॅबिनेटमधील अनेक मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला आहे.

लोकसभा निवडणुकीचे निकाल अतिशय धक्कादायक लागले आहेत. या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही.भाजपसाठी हा फार मोठा धक्का आहे. कारण भाजपकडून 400 पारचा नारा दिला जात होता. पण भाजपला 272 हा बहुमताचा आकडा पार करता आलेला नाही. तरीदेखील भाजप हाच मोठा पक्ष ठरला आहे. भाजपला 240 जागांवर विजय मिळाला आहे. तर काँग्रेसला 99 जागांवर यश मिळालं आहे. या निवडणुकीत इंडिया आघाडीचं परफॉर्मन्स वाढलं आहे. कारण इंडिया आघाडीला एकूण 234 जागांवर विजय मिळाला आहे. भाजपप्रणित एनडीला 292 जागांवर यश मिळालं आहे. त्यामुळे भाजपचं सरकार अस्तित्वात येण्यास काही अडचण नाही. पण तरीदेखील भाजपसाठी हा मोठा धक्का आहे. 400 पारचा आकडा घोषणा करणाऱ्या पक्षाला लोकसभेत 250 चा आकडाही पार करता आलेला नाही. याशिवाय मोदी सरकारच्या केंद्रीय कॅबिनेटमधील दिग्गज नेत्यांना या निडणुकीत दणका बसला आहे. सर्वसामान्य जनतेने अनेक मंत्र्यांना यावेळी घरचा रस्ता दाखवला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे.
जनतेने ‘या’ केंद्रीय मंत्र्यांना दाखवला घरचा रस्ता
- महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसला आहे. कारण गेल्या निवडणुकीत तब्बल 22 जागा जिंकणाऱ्या भाजपला यावेळी केवळ 9 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील दोन केंद्रीय मंत्र्यांना जनतेने घरचा रस्ता दाखवला आहे. यामध्ये भाजपच्या केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार यांचा समावेश आहे. भारती पवार यांना दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपने उमेदवार दिली होती. पण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भास्करराव भगरे यांनी त्यांचा पराभव केला.
- महाराष्ट्रातील आणखी एका केंद्रीय मंत्र्यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांचा पराभव झाला आहे. कपिल पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. कपिल पाटील यांचा पराभव होईल, असं कुणाला वाटलं नव्हतं. पण यावेळी कपिल पाटील यांनादेखील जनतेने घरचा रस्ता दाखवला आहे. कपिल पाटील हे केंद्रीय पंचायत राज मंत्री होते. पण त्यांच्या कामांवर जनता खूश नसल्याची आता स्पष्ट झाली आहे.
- भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनादेखील या निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. स्मृती इराणी यांचा अमेठी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार किशोरीलाल शर्मा यांनी तब्बल 1 लाख 67 हजार 196 मतांनी पराभव केला आहे. शर्मा यांना 539228 लाख मतं मिळाली आहेत. तर स्मृती इराणी यांना 372032 मतांवर समाधान मानावं लागलं आहे.
- कैलाश चौधरी : राजस्थानच्या बारमेर येथील भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री कैलाश चौधरी यांचा दारूण पराभव झाला आहे. काँग्रेसचे उमेदवार राम बेनिवाल यांनी त्यांचा 417943 लाख मतांनी पराभव केला. या जागेवर ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. अपक्ष रवींद्र भाटी हे चक्क 586500 इतके मतं मते मिळवून दुसऱ्या स्थानावर राहिले.
- आरके सिंह : बिहारमधील आरामधून भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री आरके सिंह यांचाही पराभव झाला आहे. सीपीआयएमचे सुदामा प्रसाद यांनी त्यांचा ५९८०८ हून अधिक मतांनी त्यांचा पराभव केला आहे. सुदामा प्रसाद यांना 5 लाखांहून अधिक मते मिळाली, तर सिंह यांना 469574 लाख मते मिळाली.
- निसिथ प्रामाणिक: कूचबिहार, बंगालमधून, TMC चे जगदीश चंद्र वसुनिया यांनी भाजप उमेदवार आणि केंद्रीय मंत्री निसिथ प्रामाणिक यांचा 39250 मतांनी पराभव केला आहे. वसुनिया यांना 788375 लाख तर प्रामाणिक यांना 749125 लाख मते मिळाली आहेत.
- राजीव चंद्रशेखर: केरळमधील तिरुअनंतपुरममधून भाजप उमेदवार आणि केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचा पराभव झालाय. काँग्रेसच्या शशी थरूर यांनी त्यांचा 16077 हजार मतांनी पराभव केला. थरूर यांना 358155 लाख मते मिळाली तर चंद्रशेखर 342078 लाख मते मिळवून दुसऱ्या स्थानावर आहेत.
- अर्जुन मुंडा : खुंटी, झारखंड येथील भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. येथे काँग्रेसचे काली चरण मुंडा यांनी 149675 लाख मतांनी विजय मिळवला. अर्जुन मुडा 361972 लाख मतांसह दुसऱ्या स्थानावर आहेत.
- अजय मिश्रा टेनी : उत्तर प्रदेशातील खेरी येथून दोन वेळा खासदार आणि केंद्रीय मंत्री असलेले अजय मिश्रा टेनी यांचा निवडणुकीत पराभव झाला. सपाच्या उत्कर्ष वर्मा यांनी टेनी त्यांचा ३४३२९ मतांनी पराभव केला. टेनी यांना ५२३०३६ लाख, उत्कर्ष वर्मा यांना ५५७३६५ लाख मते मिळाली. तर बसपाचे उमेदवार अंशय सिंग कालरा यांना ११०१२२ मते मिळाली.
- महेंद्रनाथ पांडे: भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री महेंद्रनाथ पांडे यूपीच्या चंदौलीमधून निवडणूक हरले. सपाचे वीरेंद्र सिंह यांनी महेंद्रनाथ पांडे यांचा 21565 हजार मतांनी पराभव केला.
- कौशल किशोर: मोहनलालगंज, यूपीमधून सपाच्या आरके चौधरी यांनी भाजपच्या कौशल किशोर यांचा 70292 हजार मतांनी पराभव केला. आरके चौधरी यांना 667869 लाख तर कौशल किशोर यांना 597577 लाख मते मिळाली.
- भानू प्रताप सिंह: भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री भानू प्रताप सिंह जालौन, यूपी येथून 53898 हजार मतांच्या फरकाने पराभूत झाले. येथे सपाचे नारायणदास अहिरवार यांना यश आलं. अहिरवार यांना 530180 मते मिळाली तर सिंग 476282 मते घेऊन दुसऱ्या स्थानावर आहेत.
- साध्वी निरंजन ज्योती : साध्वी निरंजन ज्योती यांना उत्तर प्रदेशातील फतेहपूरमधून पराभवाला सामोरे जावे लागले. येथे सपाचे नरेश चंद्र उत्तम पटेल यांनी साध्वी यांचा ३३,१९९ हजार मतांनी पराभव केला. नरेश चंद्र यांना 500328 लाख तर साध्वी यांना 467129 लाख मते मिळाली.
- संजीव कुमार बल्यान : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री संजीव कुमार बल्यान यांना यूपीतील मुझफ्फरनगरमधून पराभवाला सामोरे जावे लागले. सपाचे हरेंद्र सिंह मलिक यांनी त्यांचा 24672 हजार मतांनी पराभव केला. मलिक यांना 470721 लाख मते मिळाली. तर बल्यान यांना ४४६०४९ लाख मते मिळाली.
