माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचा तृणमूलमध्ये प्रवेश; भाजपची डोकेदुखी वाढली
अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय अर्थमंत्री आणि परराष्ट्र मंत्रीपद भूषविलेले ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी अखेर आज तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
कोलकाता: अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय अर्थमंत्री आणि परराष्ट्र मंत्रीपद भूषविलेले ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी अखेर आज तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ऐन पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच यशवंत सिन्हा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना साथ देण्याचा निर्णय घेतल्याने भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे. (Former BJP leader Yashwant Sinha joins Trinamool)
82 वर्षीय यशवंत सिन्हा हे गेल्या काही दिवसांपासून सक्रिय राजकारणापासून दूर होते. केंद्रात 2014मध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर मोदींच्या कार्यपद्धतीवर ते नाराज होते. मोदींना अनेक पत्र लिहून भेटण्याची वेळ मागूनही वेळ न दिल्याने सिन्हा अस्वस्थ होते. याच अस्वस्थतेतून त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर सामाजिक संघटनांच्या माध्यमातून सक्रिय होते. मात्र त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केला नव्हता. आज अखेर त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करून सर्वांनाच आश्चर्यचा धक्का दिला आहे. सिन्हा हे अत्यंत कुशाग्र बुद्धीचे नेते आहेत. माजी अर्थ मंत्री असलेल्या सिन्हा यांच्या तोफेपुढे भाजपचे नेते निवडणुकीत कसा प्रतिवाद करतात याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे.
म्हणून पक्षप्रवेश
अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात सामुहिक निर्यण घेतला जात होता. मात्र, आजचं सरकार हम करे सोच्या दिशेने जात आहे. त्यामुळेच अकाली दलासारखा मित्र पक्षही त्यांच्यापासून दुरावला आहे. आज भाजप सोबत कोण आहे?, असा सवालही त्यांनी केला. ममता बॅनर्जी यांच्यावर जो हल्ला झाला होता. तो टिपिंग पॉइंट होता. त्यामुळेच मी टीएमसीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे, असं ते म्हणाले.
त्रिवेदींच्या जागी सिन्हा
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्रिवेदी यांनी यापूर्वीच राज्यसभा सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्रिवेदी यांच्या जागी सिन्हा यांना ममता बॅनर्जी राज्यसभेवर पाठवू शकतात, असं राजकीय सूत्रांनी सांगितलं.
सिन्हांमुळे टीएमसीला किती फायदा
सिन्हा हे ग्रासरूटचे नेते नाहीत. त्यांचा पश्चिम बंगालवर फारसा प्रभाव नाही. त्यामुळे मतांच्या गणितात त्यांचा भाजपला काहीच फायदा होणार नाही. मात्र दिनेश त्रिवेदी, सुवेंदू अधिकारींपासून ते मिथुन चक्रवर्तीपर्यंतच्या नेत्यांनी टीएमसीला सोडचिठ्ठी दिल्याने टीएमसीच्या नेते आणि कार्यकर्त्यांचं मनोबल खचले आहे. अशा काळात यशवंत सिन्हांसारखा देशातील मोठा नेता टीएमसीमध्ये आल्याने पक्ष कार्यकर्त्यांचं मनोबल उंचावणार आहे. त्यामुळे पक्षातील आलेली मरगळही झटकली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
कोण आहेत सिन्हा?
सिन्हा हे आयएएस अधिकारी होते. नोकरी सोडून ते राजकारणात आले होते. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते. अटल सरकारमध्ये अर्थमंत्री आणि परराष्ट्र मंत्रीही राहिले आहेत. वाजपेयींचे निकटवर्तीय म्हणूनही ते प्रसिद्ध होते. मात्र, मोदींची भाजप त्यांना पसंत पडली नाही. त्यामुळे त्यांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर सातत्याने टीका केली होती. त्यांचे चिरंजीव जयंत सिन्हा हे भाजपचे खासदार आहेत. (Former BJP leader Yashwant Sinha joins Trinamool)
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 13 March 2021https://t.co/TMhX8UEerm
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 13, 2021
संबंधित बातम्या:
दिदीची विचारपुस करण्यासाठी भाजप नेते हॉस्पिटलमध्ये, तर TMC ची निवडणूक आयोगाकडे तक्रार, वाचा सविस्तर
ममता बॅनर्जींच्या मान आणि पायाच्या हाडाला गंभीर दुखापत; प्रचाराला मुकणार?
ममता बॅनर्जी SSKM रुग्णालयात दाखल, राज्यभरात TMC कार्यकर्ते रस्त्यावर
(Former BJP leader Yashwant Sinha joins Trinamool)