श्रीमंतीचा अहंकार मोडणारं गाणं, जे 60 वर्षांपासून प्रचंड लोकप्रिय, आजही ऐकतात लोक
60 वर्षांपूर्वीचं गाणं, ज्याने श्रीमंत असणाऱ्या लोकांचा अहंकार मोडला. श्रीमंत आणि गरीब यांना एकाच तराजूत तोलणारे हे गाणं आजही लोक प्रचंड ऐकतात.

संपत्ती, प्रसिद्धी आणि मोठेपणाच्या मागे धावणाऱ्या जगाला आजही एका क्षणासाठी थांबवून विचार करायला लावणारं गाणं म्हणजे ‘सजन रे झूठ मत बोलो’. 1966 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तीसरी कसम’ या चित्रपटातील हे सदाबहार गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे. मुकेश यांचा भावपूर्ण आवाज, गीतकार शैलेन्द्र यांचे अर्थपूर्ण शब्द आणि शंकर-जयकिशन यांचे सुरेल संगीत यामुळे हे गाणं केवळ मनोरंजन न राहता आयुष्याचं तत्त्वज्ञान सांगणारं गाणं ठरलं आहे.
‘तीसरी कसम’ हा चित्रपट फणीश्वरनाथ रेणू यांच्या ‘मारे गए गुलफाम’ या कथेवर आधारित होता. बासु भट्टाचार्य यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. चित्रपटात राज कपूर यांनी भोळ्या, साध्या बैलगाडीवाल्या हीरामनची भूमिका साकारली होती तर वहीदा रहमान यांनी हीराबाईची व्यक्तिरेखा साकारली होती. ग्रामीण जीवन, माणुसकी, नाती आणि समाजाच्या रूढी-परंपरांचं वास्तववादी चित्रण या चित्रपटातून करण्यात आलं.
‘सजन रे झूठ मत बोलो’
चित्रपटातील ‘सजन रे झूठ मत बोलो’ हे गाणं माणसाच्या आयुष्यातील क्षणभंगुरतेची जाणीव करून देतं. माणूस कितीही श्रीमंत, प्रतिष्ठित किंवा मोठा झाला तरी शेवटी त्याला हे जग सोडून जावंच लागतं. हा साधा पण प्रभावी संदेश या गाण्यातून दिला आहे. त्यामुळेच या गाण्यातील शब्द आजच्या काळातही तितकेच समर्पक वाटतात.
मुकेश यांच्या आवाजातील या गाण्याची खासियत म्हणजे त्यातील सहजता. उपदेशाचा सूर न लावता अत्यंत शांतपणे आणि आपुलकीने आयुष्याची शिकवण देणारा हा आवाज श्रोत्यांच्या मनाला भिडतो. दौलत, अहंकार आणि लालसेपेक्षा माणुसकी व प्रामाणिकपणा अधिक महत्त्वाचा आहे. हा विचार गाणं प्रभावीपणे मांडतं.
आर्थिक अडचणींचा सामना
‘तीसरी कसम’ला आज भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्त्वाच्या कलाकृतींपैकी एक मानलं जातं. या चित्रपटाला 1967 मध्ये सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मात्र, प्रदर्शनाच्या वेळी चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळालं नाही. या अपयशामुळे निर्माता आणि गीतकार शैलेन्द्र यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.
आज मात्र ‘तीसरी कसम’ तिची संवेदनशील कथा, राज कपूर आणि वहीदा रहमान यांचा अभिनय आणि अविस्मरणीय गाण्यासाठी आवर्जून लक्षात ठेवली जाते. त्यातील ‘सजन रे झूठ मत बोलो’ हे गाणं काळाच्या ओघात अधिकच अर्थपूर्ण ठरलं आहे. पैसा आणि प्रतिष्ठा क्षणिक आहेत; शेवटी माणुसकी आणि चांगुलपणाच माणसासोबत राहतो, याची जाणीव करून देणारं हे गाणं आजही रसिकांच्या मनात घर करून आहे.
