राखी बांधताना हे गाणं ऐकलं नाही तर रक्षाबंधनच अपूर्ण ! 61 वर्षांपूर्वीचं गीत आजही तितकंच लोकप्रिय
भावा-बहिणीचं प्रेम हे अतूट आणि अगदी निस्वार्थी असतं. 61 वर्षांपूर्वीच्या या गाण्यातून भाऊ-बहिणीतलं हे प्रेम पुरेपूर झळकतं. असं कोणीच नसेल, की हे गाणं ऐकल्यावर ज्यांचे डोळे पाणावत नसतील. जाणून घेऊया कोणतं आहे ते अजरामर गीत..

हिंदी सिनेमात प्रत्येक प्रसंगासाठी गाणी असतात. आता रक्षाबंधनाचा सण उद्यावर येऊन ठेपल्यावर भाऊ-बहिणीच्या नात्यातील गोडवा आणखी वाढवणारी बॉलिवूडची काही गाणी पुन्हा ऐकली जातात, आठवली जातत. या गाण्यांनी अनेक वर्षांनंतरही रक्षाबंधनाच्या प्लेलिस्टमध्ये आपले स्थान कायम ठेवलं आहे. खरं तर, बॉलिवूडनेही अनेक सुंदर गाण्यांच्या माध्यमातून भाऊ-बहिणीचं नातं संस्मरणीय बनवलंय. आजही बहिणी आपल्या भावाला राखी बांधताना हे गाणं आवर्जून गुणगुणतात. रक्षाबंधनानिमित्त आज आपण 61 वर्षांपूर्वी आलेल्या, भाऊ-बहिणीच्या अशाच एका गाण्याबद्दल जाणून घेणार आहोत, जे राखी बांधताना हमखास ओठांवर येतं. प्रत्येक बहीण हे गाणं आपल्या भावाला डेडिकेट करते. या गाण्याचे शब्द थेट मनाला भिडणारे आहेत. त्यामुळेच 61 वर्षांनंतरही या गाण्याचं लोकांच्या मनातलं सथान अढळ आहे.
कोणतं आहे ते गाणं ?
1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘काजल’ चित्रपटातील एक गाणं आजही म्हणजेच 61 वर्षांनंतरही रक्षाबंधनाच्या दिवशी मोठ्या आवडीने ऐकलं जातं. ते गीत म्हणजे — “मेरे भैया मेरे चंदा, मेरे अनमोल रतन”.. या गाण्याचे बोल इतके गोज आहेत की प्रत्येक ओळीतून भाऊ-बहिणीच्या नात्यातील सौंदर्य आणि त्याचं प्रेम दिसतं. या गाण्यात विख्यात अभिनेत्री मीना कुमारी आपल्या भावासाठी गात असतात. त्या आपल्या भावाला चंद्राची उपमा देत तो अगदी अनमोल रत्न असल्याचंही म्हणतात. मला आपल्या भावाच्या बदल्यात आपल्याला दुसरं काहीही नको, असंही त्या या गाण्यातून स्पष्टपणे सांगतात. हे केवळ एक गाणं नाही, तर भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आवाज बनलं आहे.
आशा भोसलेंच्या अवीट सुरांची जादू
‘काजल’ चित्रपटामधील मधील ‘मेरे भैया, मेरे चंदा, मेरे अनमोल रतन’ या गाण्याचे बोल प्रसिद्ध गीतकार साहिर लुधियानवी यांनी लिहिले होते. त्यांचे शब्द साधे आणि थेट हृदयाला भिडणारे होते. या गाण्याला रवि यांनी संगीत दिलं होतं, तर आपल्या अवीट सुरांनी आशा भोसले यांनी हे गाणं अजरामर केलं. या गाण्याची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याचे शब्द. त्यामध्ये एक बहीण आपल्या भावासाठी मनातील भावना व्यक्त करते. त्यामुळेच हे गाणं केवळ एका चित्रपटातील गीत राहिलं नाही, तर रक्षाबंधनाच्या दिवशी भावावरील प्रेम व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग बनलं आहे.
61 वर्षांनंतरही हे गाणं खास का ?
आजच्या काळात अनेक भाऊ-बहिणी एकमेकांपासून दूर असतात. सोशल मीडियावर मेसेज आणि व्हिडिओ शेअर करून ते वेगवेगळ्या पद्धतीने आपलं प्रेम व्यक्त करतात. मात्र ‘मेरे भैया मेरे चंदा’ सारखी जुनी गाणी त्या नात्यातील एका साधेपणाची आठवण करून देतात, जी काळ बदलला तरी जुनी होत नाही.
