‘अरुंधती’चा जबरदस्त कमबॅक; अमोल कोल्हेंसोबत मालिका, साकारणार ऐतिहासिक भूमिका
'आई कुठे काय करते' या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर आता एका ऐतिहासिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डॉ. अमोल कोल्हे यांच्यासोबत ती महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.

राजा शिवछत्रपती, जय भवानी जय शिवाजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मालिकांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा सुवर्ण इतिहास नव्या पीढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न स्टार प्रवाह वाहिनीकडून आजवर झाला. त्यानंतर आता लवकरच क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या संघर्षमयी जीवनाची गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साधारणतः दिडशे वर्षांपूर्वी महिलांना चूल आणि मूल या बंधनात बंदिस्त केलेल्या समाज व्यवस्थेविरोधात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतीबा फुले यांनी एल्गार पुकारला. या दोघांनी मिळून केलेल्या संघर्षामुळे मुलींना शिक्षणाच्या गंगोत्री खुली झाल्यानं खऱ्या अर्थानं शिकून सज्ञान होता आलं.
अत्यंत बिकट परिस्थितीत, प्रसंगी घरच्यांचा आणि समाजाचा दुहेरी रोष पत्करून त्यांनी काम केलं. अशा क्रांतिकारी दाम्पत्याचे त्याकाळातील विचार आजच्या पीढीपर्यंत पोहोचावेत या हेतूने स्टार प्रवाह वाहिनी ही मालिका प्रेक्षक भेटीला घेऊन येत आहेत. सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी गोखले सावित्रीबाई फुलेंची भूमिका साकारणार असून डॉ. अमोल कोल्हे जोतीबा फुलेंच्या भूमिकेत दिसतील. अमोल कोल्हेंच्या जगदंब क्रिएशन्स या निर्मिती संस्थेने या मालिकेची निर्मिती केली आहे.
मधुराणी गोखले आपली भावना व्यक्त करताना म्हणाली, “सावित्रीबाई फुले युगस्त्री होत्या. इतकं आभाळाएवढं व्यक्तिमत्त्व साकारायला मिळणं मोठी जबाबदारी आहे. आज आपण मुक्तपणे शिकत आहोत, आपल्याला पाहिजे त्या क्षेत्रात काम करत आहोत, अभिमानाने मिरवत आहोत. पण त्यासाठी दीडशे वर्षांपूर्वी एका स्त्रीने इतका मोठा संघर्ष केला. मला सगळ्यांच्या वतीने सावित्रीबाईंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळतेय याचा आनंद आहे. उत्सुकता, हुरहूर आणि दडपण अश्या संमिश्र भावना आहेत. प्रेक्षकांनी साथ द्यावी हीच अपेक्षा आहे.”

डॉ. अमोल कोल्हे म्हणाले,”कलाकार म्हणून माझं भाग्य आहे की वेगवेगळ्या लार्जर दॅन लाईफ भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली. महात्मा जोतीराव फुले यांची व्यक्तिरेखा साकारणं हे एक वेगळं आव्हान आहे. विचारांची धगधगती मशाल म्हणजे महात्मा जोतीराव फुले. व्यवस्थेला प्रश्न विचारायची सुरुवात महात्मा फुलेंनी केली. अश्या क्रांतीकाराचे विचार पोहोचवणं ही मोठी जबाबदारी आहे. स्टार प्रवाहसोबतचं नातं खूप खास आहे. माझ्या आयुष्याला ज्या भूमिकेने कलाटणी दिली ती राजा शिवछत्रपती मालिका मी स्टार प्रवाहसोबत केली. जवळपास १७ वर्षांनंतर आता स्टार प्रवाहसोबत फक्त अभिनेता म्हणून नाही तर निर्माता म्हणून देखिल काम करणार आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं समाजाप्रती जे योगदान आहे ते शब्दात वर्णन करणं केवळ अशक्य आहे. आज उंबरठ्याबाहेर पाऊल टाकणाऱ्या प्रत्येक स्त्रीची प्रेरणा जर कुणी असतील तर त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आहेत. त्यामुळे सावित्रीबाईंचा इतिहास मालिकेतून साकारणं माझ्यासाठी अत्यंत भावनिक गोष्ट आहे.”
या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टविषयी सांगताना स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, “आजच्या जगात सर्वत्र स्त्री–पुरुष समानतेची वाटचाल सुरू आहे. देशातील महत्त्वाच्या पदांवर स्त्रिया सक्षमपणे काम करताना दिसतात. परंतु काही काळापूर्वी त्यांची मर्यादा केवळ घर आणि मुलांपर्यंतच होती. ज्या समाजात मुलगी आठ वर्षांची झाली की तिला “वयात आली” असे म्हणत तिचे हसणे–खेळणे रोखले जाई, जिथे शिक्षण ही फक्त काही विशिष्ट लोकांची मक्तेदारी होती—अशा समाजात धैर्याने घराबाहेर पडून शिक्षणाचा मूलभूत हक्क मिळवून देणाऱ्या महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मोठी क्रांती घडवली. केवळ शिक्षणच नव्हे तर विधवा पुनर्विवाह, बालविवाह, सतीप्रथा अशा अनेक अमानुष रूढींना ठामपणे विरोध करून संतुलित समाज उभारण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हा ऐतिहासिक प्रवास शक्य झाला तो सावित्रीबाई फुले यांच्या कष्टामुळे आणि महात्मा जोतीबा फुले यांच्या ठाम पाठिंब्यामुळे. सावित्रीबाई संसार सांभाळून समाजपरिवर्तनाची लढाई लढल्या. त्यांच्यामुळेच आज प्रत्येक स्त्री समाजात मानाने जगू शकते. अश्या महान क्रांतिज्योतीची कथा मांडणं क्रमप्राप्त होतं. माझी खात्री आहे की ही मालिका समस्त मालिका विश्वात मैलाचा दगड ठरेल.”
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या संघर्षमय जीवनाचा आढावा घेणारी नवी मालिका ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ५ जानेवारी २०२६ पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
