घटस्फोटानंतर तुम्ही एकमेकांचे शत्रू..; किरण रावबद्दल आमिर खान स्पष्टच बोलला
अभिनेता आमिर खानने नुकतंच तिसरं लग्न केलं. त्याआधी त्याचा रीना दत्ता आणि किरण राव यांच्याशी घटस्फोट झाला. एका मुलाखतीत आमिर खान घटस्फोट आणि त्यानंतर पूर्व पत्नींसोबत असलेल्या नात्याविषयी व्यक्त झाला होता.

चित्रपटसृष्टीतील दमदार कामगिरीमुळे ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा आमिर खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील नात्यांबद्दल मात्र तितका परफेक्शनिस्ट ठरला नाही. रीना दत्ता आणि किरण राव यांना घटस्फोट दिल्यानंतर आमिरने नुकतंच तिसरं लग्न केलं. त्याने वयाच्या 61 व्या वर्षी गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटशी नोंदणी पद्धतीने लग्न करत आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. या लग्नापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत तो किरण रावसोबतच्या घटस्फोटाविषयी आणि घटस्फोटानंतर जपलेल्या मैत्रीविषयी मोकळेपणे व्यक्त झाला आहे. आमिरने 2005 मध्ये किरण रावशी लग्न केलं होतं. लग्नाच्या 16 वर्षांनंतर या दोघांनी घटस्फोट घेतला. मात्र घटस्फोटानंतरही दोघं एकमेकांसोबत विविध प्रोजेक्ट्सवर काम करत राहिले. आमिर आणि किरणने नात्यातील कटुतेच्या ऐवजी मैत्रीला निवडलं.
‘न्यूज 18’ला दिलेल्या मुलाखतीत आमिर म्हणाला होता, “हे कोणत्या डॉक्टरांनी सांगितलंय की घटस्फोटानंतर तुम्ही लगेच एकमेकांचे शत्रू बनता? मी नशिबवान आहे की माझ्या आयुष्यात किरण आली आणि आमचा प्रवास खूपच समाधानकारक राहिला. आम्ही एकत्र राहून बऱ्याच गोष्टी पूर्ण केल्या आहेत आणि यापुढेही एकत्र काम करत राहू. आम्ही माणुसकी आणि भावनिकदृष्ट्या एकमेकांशी जोडलेले आहोत आणि कायम राहू.”
घटस्फोटानंतरही किरण आमिरच्या पहिल्या पूर्व पत्नीच्या मुलीच्या लग्नात उपस्थित होती. इतकंच नव्हे तर किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ या चित्रपटाचं प्रमोशन आमिरने केलं होतं. या दोघांचं नातं अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. यावरून नेटकऱ्यांनी दोघांना ट्रोलसुद्धा केलंय. या ट्रोलिंगवर किरण रावनेही प्रतिक्रिया दिली होती. “आमिर खानला घटस्फोट दिल्यानंतर माझ्या वैयक्तिक आयुष्याविषयी लोक अधिकच गॉसिप करू लागले. घटस्फोटानंतर आम्ही इतरांप्रमाणे एकमेकांचा द्वेष करत बसलो नाही. किंबहुना चांगले मित्र म्हणून एकत्र आले, हेसुद्धा अनेकांना खुपलं. स्त्रियांना जाणीवपूर्ण किंवा नकळतपणे अशा संघर्षांसाठी उभं केलं जातं,” असं ती म्हणाली होती.
किरण रावला डेट करण्याआधी आमिर खानचं रिना दत्ताशी लग्न झालं होतं. ‘लगान’ चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या वर्षभरानंतर 2002 मध्ये आमिर आणि रिना विभक्त झाले. ‘लगान’ या चित्रपटात किरणने सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम केलं होतं. त्यामुळे चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यामुळेच आमिरने रिनाला घटस्फोट दिला, अशा चर्चांना उधाण आलं होतं.
