83 वर्षीय अमिताभ बच्चन यांना ‘या’ गोष्टीची सवय; एक दिवस नाही केलं तरी होतात अस्वस्थ
बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांनी नुकत्याच त्यांच्या एका पोस्टमध्ये विशिष्ट सवयीबद्दल सांगितलं आहे. वयाच्या 83 व्या वर्षीही बिग बींना या गोष्टीची इतकी सवय आहे की एक दिवस जरी नाही केलं तरी त्यांना अस्वस्थ वाटू लागतं.

बॉलिवूडचे ‘शहेनशाह’ म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन वयाची ऐंशी ओलांडल्यानंतरही कामात आणि सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. एक्स (ट्विटर) अकाऊंटवर ते सतत काही ना काही पोस्ट लिहित असतात. तर आपल्या ब्लॉगमध्येही ते विविध अनुभव, विचार मांडत असतात. सहा दशकांपेक्षाही अधिक काळापासून इंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या बिग बींनी अनेक भाषांमध्ये काम केलंय. इतक्या वर्षांनी त्यांनी आपल्या दमदार अभिनयासाठी अनेक पुरस्कारसुद्धा जिंकले आहेत. नुकत्याच एका ब्लॉगमध्ये बिग बींनी त्यांच्या एका अशा सवयीचा खुलासा केला, जी एक दिवस जरी नाही केली तरी त्यांना चुकल्यासारखं वाटतं. बिग बींची ही सवय ‘सतत काम करण्याची’ आहे. एक दिवस जरी कामात खंड पडला, तर त्यांना ही गोष्ट अस्वस्थ करणारी वाटते.
वयाच्या 83 व्या वर्षीही अमिताभ बच्चन यांना सुट्टी घ्यायला आवडत नाही. त्यांना दररोज न चुकता काम करत राहायला आवडतं. या पोस्टमध्ये बिग बींनी लिहिलंय, ‘एक असा दिवस जो पूर्णपणे आळसाने भरलेला होता.. यामागचं काहीच खास कारण नव्हतं. पण दररोज काम न करणं थोडं विचित्र वाटतं. जेव्हा तुम्ही दररोजच्या ठरलेल्या शेड्युलनुसार काम करत नाहीत, तेव्हा सवयी लावण्याची जी प्रक्रिया आधीच सुरू झालेली असते.. तो दिवस अचानक अशा कामांचं एक कोडं बनून जातो, जी काम सहसा उत्तम समन्वयाने पार पडतात.’
View this post on Instagram
बिग बी या पोस्टमध्ये पुढे म्हणतात, ‘तुम्हाला आश्चर्या वाटतं की आजचा दिवस तुमच्या अपेक्षेप्रमाणे चांगला का जात नाहीये. म्हणून जर आपल्याला या पैलूची थोडी समज असेल, तर आपल्या सभोवताली शांतता आणि स्थिरता नांदू शकते. पण काही लोकांच्या बाबतीत असं कधीच घडत नाही आणि त्यामुळे त्यांची चिंता आणखी वाढते. असं म्हटलं जातं की चिंतेत जगणं हे मन आणि शरीर या दोन्हींसाठी हानिकारक आहे. या दुर्बळतेमुळे चिंतेने भरलेला दिवस घालवणं अजिबात आवश्यक नाही.’
अमिताभ बच्चन हे ‘कल्की 2898 एडी’मधून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. नाग अश्विन दिग्दर्शित या चित्रपटात प्रभास, दीपिका पादुकोण आणि कमल हासन यांच्या मुख्य भूमिका होत्या. या सायन्स फिक्शन ड्रामामध्ये बिग बींनी अश्वत्थामाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने जगभरात 1000 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती. सध्या ते याच चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये काम करत आहेत.
