Bigg Boss 18 Winner: करणवीर मेहराने पटकावली ‘बिग बॉस 18’ची ट्रॉफी; मिळाले तब्बल इतके लाख रुपये
Bigg Boss 18 Winner Karanveer Mehra: प्रसिद्ध टीव्ही अभिनेता करणवीर मेहराने बिग बॉसच्या अठराव्या सिझनचं विजेतेपद पटकावलं आहे. विवियन डिसेना आणि करणवीर यांच्यात अंतिम चुरस रंगली होती. अखेर करणवीरने यात बाजी मारली आहे.

‘बिग बॉस 18’चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला असून करणवीर मेहराने विजेतेपद पटकावलं आहे. 105 दिवसांच्या खेळानंतर अखेर या सिझनचा विजेता सूत्रसंचालक सलमान खानने जाहीर केला. यंदाच्या सिझनमध्ये 23 स्पर्धक सहभागी झाले होते. त्यापैकी विवियन डिसेना, करणवीर मेहरा, रजत दलाल, अविनाश मिश्रा, चुम दरांग आणि ईशा सिंह हे स्पर्धक टॉप 6 पर्यंत पोहोचले होते. अंतिम लढत विवियन डिसेना आणि करणवीर मेहरा या दोघांमध्ये होती. तर फिटनेस इन्फ्लुएन्सर रजत दलाल या शोमध्ये तिसऱ्या स्थानी राहिला. करणला 50 लाख रुपये बक्षीस आणि बिग बॉसची ट्रॉफी मिळाली आहे. शेवटच्या दहा मिनिटांमध्ये करणवीर आणि विवियनसाठी लाइव्ह वोटिंग सुरू करण्यात आली होती. त्यात करणवीरने बाजी मारली आहे. विशेष म्हणजे त्याने याआधी ‘खतरों के खिलाडी’ या शोचंही विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर तो बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता.
बिग बॉसच्या पहिल्या दिवसापासून करणची खेळी विशेष चर्चेत होती. एकीकडे अविनाश मिश्रा आणि रजत दलाल यांनी मैत्रीपेक्षा खेळाला अधिक महत्त्व दिलं. तर दुसरीकडे करणवीर हा शिल्पा शिरोडकर आणि चुम दरांगसोबतच्या मैत्रीत प्रामाणिक राहिला. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी किंवा अव्वल ठरण्यासाठी त्याने कोणाच्या पाठीत खंजीर खुपसलं नाही किंवा कोणाची फसवणूक केली नाही. यामुळेच त्याला प्रेक्षकांकडून खंबीर पाठिंबा मिळत गेला. करणवीरचा प्रामाणिक आणि बेधडक स्वभाव प्रेक्षकांच्या पसंतीस उरतला.




View this post on Instagram
6 ऑक्टोबर 2024 पासून बिग बॉसचा अठरावा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. 105 दिवस बिग बॉसच्या घरात राहिल्यानंतर अखेर या स्पर्धकांचा प्रवास संपुष्टात आला आहे. करणवीर मेहराने 2005 मध्ये ‘रिमिक्स’ या शोद्वारे करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्याने ‘बिवी और मैं’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारली. त्याने ‘रागिनी एमएमएस 2’, ‘मेरे डॅड की मारूती’, ‘ब्लड मनी’, ‘बदमाशियाँ’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलंय. ‘फिअर फॅक्टर : खतरों के खिलाडी 14’चा तो विजेता ठरला होता. करणवीरने ‘पवित्र रिश्ता’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘परी हूँ मैं’, ‘बडे अच्छे लगते है’, ‘ससुराल सिमर का’, ‘डोली अरमानों की’ यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.