‘धुरंधर 2’चे 1000 कोटीसुद्धा या चित्रपटासमोर ‘झिरो’; भारताचा पहिला ब्लॉकबस्टर
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर 2' या चित्रपटाने जगभरात कमाईची त्सुनामीच आणली आहे. तब्बल 1600 कोटींची कमाई करणारा हा चित्रपट तुफान चर्चेत आहे. परंतु भारताचा पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट कोणता आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?

रणवीर सिंहचा ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन 15 दिवस उलटले असले तरी अद्याप बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई सुरू आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाने जगभरात 1600 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. एकीकडे ‘धुरंधर 2’च्या कमाईची चर्चा होत असतानाच भारतीय सिनेसृष्टीत दुसरा एक असाही चित्रपट आहे, ज्याने सर्वांत आधी एक कोटी रुपये कमावले होते. हा चित्रपट स्वातंत्र्यापूर्वी प्रदर्शित झाला होता. त्याकाळी बॉक्स ऑफिसवर एक कोटी रुपये कमावणं ही खूप मोठी गोष्ट होती. सध्या ‘धुरंधर 2’ची जी क्रेझ प्रेक्षकांमध्ये पहायला मिळतेय, तशीच क्रेझ त्यावेळी या चित्रपटासाठी होती. या चित्रपटाचं नाव आहे ‘किस्मत’. 1943 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने त्याकाळी विक्रम रचला होता.
‘किस्मत’ हा भारतात एक कोटी रुपये कमावणारा पहिला चित्रपट ठरला होता. ज्ञान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात अशोक कुमार, मुमताज शांती आणि शाह नवाज मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने भारतीय सिनेसृष्टीत काही बोल्ड थीम्सची सुरुवातसुद्धा केली होती. अँटी हिरो, लग्नाविनाच आई होणं.. अशा पुढच्या काळातील संकल्पना यात मांडल्या होत्या. तरी या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळाली होती. बॉक्स ऑफिस कलेक्शनवरूनच या चित्रपटाचं यश सहज स्पष्ट होतं.

‘धुरंधर 2’च्या प्रदर्शनाच्या वेळी अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धाची जशी सुरुवात झाली, त्याच प्रकारे ‘किस्मत’ हा चित्रपटसुद्धा दुसऱ्या विश्वयुद्धादरम्यान प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर भरपूर यश मिळालं. भारताचा पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट म्हणून ‘किस्मत’ने नाव कमावलं होतं. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळणारं प्रेम पाहून त्याचं तमिळ आणि तेलुगू भाषेत रीमेकसुद्धा बनवण्यात आलं होतं. 1956 साली तमिळ भाषेत ‘प्रेमा पासम’ या नावाने आणि तेलुगू भाषेत ‘भले रामुडू’ या नावाने हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’ या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. या चित्रपटांमध्ये रणवीर सिंह, आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, राकेश बेदी, सारा अर्जुन यांच्या भूमिका आहेत. शनिवारी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 25 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली. प्रदर्शनाच्या 18 व्या दिवशीही या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय.
