भारतामध्ये नाही तर पाकिस्तानमध्ये बनणार ‘धुरंधर 3’, खऱ्या जमील जमालीने केली घोषणा, म्हणाली आता खरी ल्यारी बघा
भारतात नाही तर पाकिस्तानमध्ये बनणार धुरंधर 3, खऱ्या जमील जमालीने केली घोषणा. म्हणाले आता तुम्हाला खरी ल्यारी दाखवणार.

Dhurandhar 2 : धुरंधर या चित्रपटातील पात्रांवरून सध्या वाद निर्माण झाला असून पाकिस्तानातील राजकारणी नबील गबोल यांनी चित्रपटातील आपल्या कथित प्रतिमेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी अलीकडेच एका कंटेंट क्रिएटरसोबत संवाद साधताना चित्रपटातील पात्रांबद्दल स्पष्ट मत मांडले.
गबोल यांच्या मते, चित्रपटातील राकेश बेदी यांनी साकारलेले ‘जमील जमाली’ हे पात्र त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी साधर्म्य दर्शवते. कथानक ज्या काळात दाखवले आहे, त्या काळात ते कराचीतील ल्यारी भागातून नॅशनल असेंब्ली (MNA) चे सदस्य होते. मात्र, चित्रपटात या पात्राला ज्या प्रकारे सादर करण्यात आले आहे, त्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्या ट्विस्टबद्दल त्यांनी आक्षेप घेतला, ज्यात या पात्राला एक इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह म्हणून दाखवण्यात आले आहे.
गबोल यांनी यावर टीका करत म्हटले की, ते पाकिस्तान किंवा पाकिस्तानी सैन्याशी थेट लढू शकत नाहीत, त्यामुळे त्यांनी त्याऐवजी चित्रपट बनवला. मात्र, यामुळे ल्यारीला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली आहे. ल्यारीतील लोकांना याचा काही फरक पडत नाही ते खूप मजबूत आहेत.
तसेच, त्यांनी आपल्या भूमिकेसाठी कॉमेडियन कलाकाराची निवड केल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली. त्यांच्या मते, त्यांची प्रतिमा योग्य पद्धतीने दाखवण्यात आलेली नाही. दुसरीकडे, राकेश बेदी यांनी या आरोपांवर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, त्यांनी साकारलेले पात्र हे केवळ नबील गबोल यांच्यावर आधारित नसून, सर्वसाधारणपणे पाकिस्तानी राजकारण्यांचे एक मिश्र चित्रण आहे.
‘ल्यारी का गब्बर’
सोशल मीडियावर होत असलेल्या ट्रोलिंगबद्दल बोलताना गबोल यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. भारतीय सोशल मीडियावर लोक त्यांच्याबाबत प्रश्न उपस्थित करत असल्याचे सांगत त्यांनी लवकरच ठोस उत्तर देण्याचा इशारा दिला. तसेच, ते आपल्या दृष्टिकोनातून प्रेरित एक चित्रपट बनवण्याचा विचार करत असून त्याचे संभाव्य शीर्षक ‘ल्यारी का गब्बर’ असे असू शकते, असेही त्यांनी सूचित केले.
गबोल यांनी यापूर्वीही ‘धुरंधर’च्या पहिल्या भागाच्या वेळी अशाच प्रकारची नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळीही त्यांच्या पात्राचे चित्रण अचूक नसल्याची टीका त्यांनी केली होती. मात्र, आता ‘धुरंधर’च्या दुसऱ्या भागाने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले असून, रिलीज झाल्यानंतर अवघ्या एका आठवड्यातच या चित्रपटाने जागतिक स्तरावर 1000 कोटी रुपयांचा टप्पा पार केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या चित्रपटाची चर्चा सध्या देश-विदेशात मोठ्या प्रमाणात होत आहे.
