Dhurandhar : ‘मी मुलगा असायला हवे होते रे..’, धुरंधरची स्क्रीप्ट वाचून यामी गौतमची प्रतिक्रिया, आदित्य धरचं उत्तर ऐकाच..
जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी... सध्या सगळीकडे फक्त धुरंधरचीच चर्चा सुरू आहे. बॉक्स ऑफीसवर तर पिक्चर जबरदस्त हिट झाला आहेच, पण प्रेक्षकांनाही तो प्रचंड आवडलाय. याचदरम्यान या चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य धर याची पत्नी आणि अभिनेत्री यामी गौतमचं विधान व्हायरल झालं आहे.

अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) आणि दिग्दर्शक आदित्य धर (Aditya Dhar) हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हक’ या चित्रपटातील भूमिकेने यामीने सर्वांचं मन जिंकलं, तर डिसेंबरमध्ये आदित्य धरचा ‘धुरंधर’ (Dhurandhar )हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आणि त्या दिवसापासून चित्रपटाचा धमाका सुरूच आहे. मोठ्या पडद्यावरचा हा पिक्चर प्रचंड यशस्वी ठरला आहे. सगळीकडे धुरंधर, अक्षय खन्ना, रणवीर सिंग यांचीच चर्चा सुरू आहे. भारतात आणि जगभराताही चित्रपटाने तगडी कमाई केली आहे. आता अभिनेत्री यामी गौतम हिनेही धुरंधर चित्रपटाबाबत मोठे विधान केले आहे.
आदित्य धरचा ‘धुरंधर’ हा चित्रपट पठाण, जवान आणि ॲनिमल सारख्या मोठ्या हिट चित्रपटांना मागे टाकत बॉलिवूडचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरला आहे. मात्र रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्यापूर्वी, त्या चित्रपटाचा भाग बनण्यााठी एक अभिनेत्री म्हणून ती किती उत्सुक होती, हेच यामीने सांगितलं आहे.
धुरंधर बद्दल काय म्हणाली यामी?
एका मुलाखतीदरम्यान यामी या चित्रपटाबद्दल भरभरून बोलली. “जेव्हा मी आदित्यची स्क्रीप्ट वाचली, तेव्हा मी त्याला म्हटलं हा अशा क्षणांपैकी आहे की मला वाटतं मी मुलगा असायला हवे होते रे… स्क्रिप्ट खूपच शानदार आहे. हे एक अद्भुत जग आहे. पण तेव्हा त्याने (आदित्य) लगेच सांगितलं की तो पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्य वेगळं राखतो. म्हणजे मला तशी काही अपेक्षा नाही. आम्ही त्या व्यावसायिक रेषेचा आदर करतो. मला वाटत नाही की ती रेष अस्पष्ट असावी. आमचं त्याबद्दल मत अगदी स्पष्ट आहे” असंही यामीने पुढे नमूद केलं.
“तो जी भूमिका लिहित आहे त्यासाठी दुसरा कोणीतरी अधिक योग्य असेल असं जर त्याला वाटत असेल, तर मला त्याबद्दल काहीच हरकत नाही. ती समज सुरुवातीपासूनच होती.” असंही तिने नमूद केलं. या संदर्भात, यामीचे नाव ‘धुरंधर’ च्या क्रेडिट्समध्ये देखील आले आहे, तिथे आदित्यने तिचे आभार मानले आहेत.
मी खूप नशीबवान आहे
काम आणि वैयक्तिक आयुष्यातील समतोल साधण्याबद्दल बोलताना यामी म्हणाली, “एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्रींना त्यांचे लग्न आणि मातृत्व लपवण्यास सांगितले जायचं. पण आज बरंच काही बदललं आहे. मी अजूनही इथे आहे. आपण अजूनही बोलत आहोत. मी अजूनही काम करू शकते आहे. ही इंडस्ट्री आम्हाला इथे जागा देत आहे. मी अजूनही काम करू शकते आणि पर्सनल आयुष्याकडेही लक्ष देऊ शकते ही चांगली गोष्ट आहे. माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर मी खूप नशीबवान आहे असं मला वाटतं” असं तिने नमूद केलं.
धुरंधरची घोडदौड सुरूच
धुरंधर हा चित्रपट सध्या बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. केवळ 24 दिवसांत या चित्रपटाने जगभरात 1100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटात रणवीर सिंग व्यतिरिक्त सारा अर्जुन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, अक्षय खन्ना, आर माधवन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
