रात्री 2 वाजता 9 पॅक पिऊन जावेद अख्तर यांनी लिहिलेली ही गझल, ठरली प्रचंड सुपरहिट, आजही लोक वेळ काढून ऐकतात
रात्री 2 वाजता 8 ते 9 पॅक पियून फक्त 9 मिनिटांमध्ये जावेद अख्तर यांनी लिहिली होती सुपरहिट गझल. आज त्या गझलची सोशल मीडियासह चाहत्यांमध्ये होते प्रचंड चर्चा.

Bollywood Song : हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक अशी गाणी आहेत, जी केवळ त्यांच्या सुरेल चालीमुळे किंवा गायकांच्या आवाजामुळेच नाही तर त्यामागील रंजक कहाण्यांमुळेही आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. अशाच गाण्यांपैकी एक म्हणजे ‘तुमको देखा तो ये खयाल आया’ हे गाणं अजरामर झालं. हे गाणं ऐकताच आजही अनेकांच्या मनात प्रेमाच्या आठवणी आणि जुन्या आठवणी जाग्या होतात.
विशेष म्हणजे या गाण्यामागे एक अत्यंत रोचक कथा दडलेली आहे. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी स्वतः एका कार्यक्रमादरम्यान या गाण्याच्या निर्मितीचा किस्सा सांगितला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, हे गाणं त्यांनी अवघ्या 9 मिनिटांत लिहिले होते आणि त्यावेळी त्यांनी प्रचंड मद्यपानही केले होते.
‘साथ साथ’ चित्रपटासाठी मिळाला होता प्रस्ताव
जावेद अख्तर यांनी सांगितले की, त्यांना ‘साथ साथ’ या चित्रपटासाठी गाणी लिहिण्याचा प्रस्ताव आला होता. चित्रपटाच्या टीममधील एक तरुण सहाय्यक दिग्दर्शक सातत्याने त्यांच्याशी संपर्क साधत होता आणि गाण्याची मागणी करत होता. मात्र प्रत्येक वेळी गप्पा, मैफिली आणि इतर चर्चांमध्ये वेळ निघून जात असे आणि गाणे लिहिण्याचे काम पुढे ढकलले जात असे.
त्या काळात जावेद अख्तर मद्यपानाच्या सवयीबद्दल खुलेपणाने बोलत असत. त्यांनी सांगितले की, अनेकदा रात्री उशिरापर्यंत बैठका चालायच्या आणि गाणे लिहिण्याचा विषय दुसऱ्या दिवसावर ढकलला जायचा. मात्र चित्रपटाच्या टीममधील तो तरुण सहाय्यक दिग्दर्शक हार मानणाऱ्यांपैकी नव्हता. तो दररोज त्यांच्याकडे गाण्याची आठवण करून देण्यासाठी येत असे.
रात्री 2 वाजता लिहिले गेले गाणं
एके रात्री त्या सहाय्यक दिग्दर्शकाने गाण्याबाबत ठाम भूमिका घेतली. जावेद अख्तर यांच्या मते, त्यावेळी रात्रीचे सुमारे 2 वाजले होते आणि त्यांनी 8 ते 9 पेग मद्यप्राशन केले होते. अशा परिस्थितीत त्यांनी कागद आणि पेन मागवले आणि गाणे लिहायला सुरुवात केली.
यातील सर्वात मजेशीर बाब म्हणजे समोर बसलेला तो सहाय्यक दिग्दर्शक त्याची शेवटची ट्रेन पकडण्याच्या घाईत होता. तो सतत घड्याळाकडे पाहत होता. त्यामुळे जावेद अख्तर यांनी कोणताही जास्त विचार न करता झपाट्याने गाणे लिहून पूर्ण केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, अवघ्या 9 मिनिटांत ही संपूर्ण गझल तयार झाली आणि त्यांनी ती त्या सहाय्यकाकडे सुपूर्द केली. यामुळेच ‘तुमको देखा तो ये खयाल आया’ ही गझल आजही प्रेम, भावना आणि सुरेल संगीताचे प्रतीक मानली जाते. तिची लोकप्रियता अनेक दशकांनंतरही तितकीच कायम आहे.
