सूरजच मास्टरमाईंड, आम्ही मूर्ख..; ‘बिग बॉस मराठी’बद्दल अंकिता वालावलकरची पोलखोल
बिग बॉसच्या घरात गेल्यावर नेमकं काय होतं आणि कोण कसा खेळ खेळतो, याविषयीची पोलखोल इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकरने केली आहे. त्याचसोबत तिने सूरज चव्हाणला खरा मास्टरमाईंड असल्याचं म्हटलंय.

‘बिग बॉस मराठी’चा सहावा सिझन सध्या चांगलाच गाजतोय. याआधी पाचव्या सिझनचं विजेतेपद सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सूरज चव्हाणने पटकावलं होतं. बिग बॉसच्या घरातील प्रत्येक स्पर्धक आपापली वेगळी रणनिती, प्लॅनिंग घेऊन येतो आणि त्यानुसार खेळू लागतो. त्यात काही जण ग्रुपच्या मदतीने पुढे जातात, तर काही जण वैयक्तिक ओळख बनवून घरात टिकून राहतात. सूरजसुद्धा असाच काहीसा होता. बिग बॉसच्या पाचव्या सिझनचा खरा मास्टरमाईंड हा सूरज चव्हाणच होता, अशी प्रतिक्रिया आता त्याच सिझनमधील स्पर्धक ‘कोकण हार्टेड गर्ल’ ऊर्फ अंकिता वालावलकरने दिली आहे. सूरजला खूप आधीपासूनच गेम कळला होता, आम्ही मूर्ख ठरलो, अशी भावना तिने या मुलाखतीत व्यक्त केली.
सूरज चव्हाणने त्याच्या गरीब परिस्थितीचा फायदा घेऊन तोच कार्ड वापरल्याची टीका अनेकांनी केली होती. याबाबत अंकिता म्हणाली, “सोशल मीडियावर इमोशन्स विकले जातात. जेवढा तुम्ही भावनिक कंटेंट द्याल, तेवढं ते लोकांना आकर्षित करणार. सोशल मीडियावर काय विकायचं, ते कसं विकलं जाणार, हे सर्व त्या व्यक्तीला बरोबर माहीत असतं. त्यामुळे कुठलाही व्यक्ती बिचारा नाही. सोशल मीडियावर दाखवल्या जाणाऱ्या भावनांमध्ये वाहून जाऊ नका. रिअॅलिटी शोजमध्ये जसं तुम्ही जातीवाचक काही बोलू शकत नाही, तसंच आता परिस्थितीवाचकही बोलायला बंदी हवी. गरीबी, बेताची परिस्थिती यांवर बोलू नका. आमच्या सिझनचा खरा मास्टरमाईंड तर सूरजच होता.”
“सूरजचा भोळेपणा पाहून त्याला गेम कळतच नाहीये, असा भ्रम आम्हाला झाला होता. पण त्याला खूप आधीच तो समजला होता. आम्ही जेव्हा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलो, तेव्हा आम्हाला याची जाणीव झाली. त्यामुळे तोच खरा मास्टरमाईंड आहे. आम्ही मूर्ख होतो. स्वत:ला कसं दाखवायचं, हे त्याला बरोबर माहीत होतं. मला बिग बॉसच्या घरात काय करायचं, हे कळतच नव्हतं. तुम्ही कितीही चांगले वागलात तरी टीव्ही काय दाखवायचं, हे त्यांच्या हातात आहे. मी बिग बॉसचे कोणतेच एपिसोड्स आधी न बघता थेट घरात स्पर्धक म्हणून गेले होते. त्यामुळे नेमकं काय करायचं, कसं खेळायचं हे मला सुरुवातीलाच समजत नव्हतं. तुम्ही दिसत नाही, असं मला कायम सांगितलं जायचं. पण त्यामुळे ते बाहेरही काढत नव्हते. बरं जे दिसत होते, त्यांनाही ते ओरडत होते. त्यांना ओरडण्याने काहीच फरक पडत नव्हता. त्यामुळे नेमकं करायचं काय, याच संभ्रमात मी शेवटपर्यंत होते”, असं अंकिताने स्पष्ट केलं.
