‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत मोठा ट्विस्ट; 6 वर्षांच्या लीपनंतर काय होणार?
गौरी-जयदीपच्या नात्यात येणार नवं वळण; मालिकेत येणार 6 वर्षांचा लीप
मुंबई- स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेत मोठा ट्विस्ट प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. मालिकेचं कथानक आता सहा वर्षांनी पुढे सरकवण्यात येणार आहे. त्यामुळे लीपनंतर जयदीप-गौरीच्या नात्यात काय बदल होणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या मालिकेत काही दिवसांपूर्वीच जयदीप-गौरीच्या आयुष्यात चिमुकल्या मुलीचं आगमन झालं.
एकीकडे शिर्केपाटील कुटुंबात कन्यारत्नाचं आगमन झाल्याने आनंदाचं वातावरण होतं. तर दुसरीकडे आपल्या मुलीला शालिनीपासून धोका आहे, ही शंका जयदीपला सतावत होती. मुलीचे प्राण वाचवण्यासाठी जयदीपने तिला सुरक्षित ठिकाणी नेण्याचा निर्णय घेतला आहे.
मुलीला घेऊन जयदीप नेमका कुठे जाणार हे कोणालाच माहीत नाही. तर शालिनीने जयदीपचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं आहे. गौरीला मात्र जयदीप आणि लक्ष्मी कुठेतरी सुरक्षित असल्याचा विश्वास आहे. त्यामुळे सहा वर्षांच्या लीपनंतर आता कथानकात मोठे वळण येणार आहे.
View this post on Instagram
लीपनंतर जयदीप-गौरीची मुलगी आता मोठी होणार आहे. बालकलाकार साईशा साळवी या मालिकेत लक्ष्मीची भूमिका साकारणार आहे. साईशाने याआधी काही जाहिराती आणि शॉर्टफिल्म्समध्ये काम केलं आहे. ती मूळची पुण्याची आहे.
साईशाने याआधी स्टार प्रवाह वाहिनीवरील पिंकीचा विजय असो या मालिकेत ओवीची भूमिका साकारली होती. आता नव्या टीमसोबतही तिची चांगली गट्टी जमली आहे.
सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील हा मोठा ट्विस्ट प्रेक्षकांना आगामी भागात पहायला मिळणार आहे. ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री 9.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते.