AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anandi Gopal Review : सामान्य जोडप्याची असामान्य प्रेरणादायी कथा

Anandi Gopal Review : भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदी गोपाळराव जोशी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट म्हणजे ‘आनंदी गोपाळ’. जेव्हा झी स्टुडिओज आणि समीर विध्वंसनं या चित्रपटाची घोषणा केली तेव्हापासूनच या चित्रपटाविषयी कुतुहल निर्माण झालं होतं. 140 वर्षांपूर्वीचा काळ पड्यावर साकारणं जिकीरीचं काम होतं. पण दिग्दर्शक समीर विध्वंसनं हे आवाहन समर्थपणं पेललं आहे. वयाच्या नवव्या वर्षी […]

Anandi Gopal Review : सामान्य जोडप्याची असामान्य प्रेरणादायी कथा
| Updated on: Jul 05, 2019 | 4:27 PM
Share
Anandi Gopal Review : भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदी गोपाळराव जोशी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट म्हणजे ‘आनंदी गोपाळ’. जेव्हा झी स्टुडिओज आणि समीर विध्वंसनं या चित्रपटाची घोषणा केली तेव्हापासूनच या चित्रपटाविषयी कुतुहल निर्माण झालं होतं. 140 वर्षांपूर्वीचा काळ पड्यावर साकारणं जिकीरीचं काम होतं. पण दिग्दर्शक समीर विध्वंसनं हे आवाहन समर्थपणं पेललं आहे.
वयाच्या नवव्या वर्षी बालपणातच आनंदीबाईंचा विवाह वयाने 20 वर्षांनी मोठे असणार्‍या गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. चित्रपटाच्या सुरुवातीला जेव्हा गोपाळराव आनंदीबाईंना बघायला येतात तेव्हा आनंदीबाईंच्या वडिलांसोबतचा संवाद आणि त्यांचा करारीपणा बघता आपण काहीतरी अद्भूत बघणार आहोत याची प्रचिती येते. लग्नानंतर गोपाळरावांनी आपल्या पत्नीचे यमुना हे नाव बदलून आनंदीबाई असे ठेवले.
लग्नानंतर आनंदीबाईंनी वयाच्या 14 व्या वर्षी एका मुलाला जन्म दिला. परंतु दुर्दैवाने पुरेशी वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने तो केवळ दहाच दिवस जगू शकला. हीच खंत आनंदीबाईंना वैद्यकीय शिक्षणाकडे खेचून घेण्यास कारणीभूत ठरली. त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास 2.30 तासात मोठ्या पडद्यावर दाखवणं सोपं नव्हत. पण समीरचा मिडास टच या सिनेमाला लाभल्यामुळे आपण या कथेत गुंतत जातो आणि चित्रपट संपल्यावरही त्यातून लवकर बाहेर पडत नाही. हेच या चित्रपटाचं यश म्हणावं लागेल.
आनंदीबाई जोशींच्या संघर्षगाथेवर अंजली कीर्तने यांनी एक डॉक्युड्रामा तयार केला होता. या लघुपटात दिलीप प्रभावळकर यांनी गोपाळराव जोशींची आणि अनुजा बिनीवाले व क्षमा खांडेकर यांनी आनंदीबाईंची भूमिका केली होती. पण ‘आनंदी गोपाळ’ हा चित्रपट आहे आणि तोही समीरनं मस्त खुलवलायं.
समीरचं या चित्रपटासाठी कौतुक तर करावंच लागेल पण त्याहीपेक्षा जास्त ललित प्रभाकर आणि भाग्यश्रीचंही करावं लागेल. ललितला आतापर्यंत आपण चॉकलेट बॉय इमेजमध्ये बघितलंय. या चित्रपटानंतर ललितची ही इमेज नक्कीच ब्रेक होईल. कारण त्याने गोपाळराव जबरदस्त साकारलेत. बऱ्याच प्रसंगात तर त्याची चीड येते. पण आपल्या बायकोनं शिकावं यामागची त्याची तळमळ लक्षात येताच त्यांच्याबद्दल सहानुभुतीही वाटायला लागते. तथाकथित समाजाला न जुमानता बायकोच्या पाठी खंबीरपणे उभे राहणारे गोपाळराव ललित जगलाय.
कोल्हापूरमध्ये मिशनऱ्यांशी ओळख वाढल्यावर तिथे प्रथम गोपाळरावांच्या मनात आलं की, आनंदीबाईंना अमेरिकेला शिक्षणासाठी पाठवावं. त्यावेळी गोपाळरावांनाही अमेरिकेला जायची इच्छा होती, परंतु ते काही जमू शकलं नाही. आनंदीबाईंना अमेरिकेला शिकायला जाण्यासाठी पैशांची तरतूद आवश्यक होती. ती करण्यात गोपाळरावांना तारेवरची कसरत करावी लागली. आनंदीबाईंना समाजाचे, शेजाऱ्या-पाजाऱ्यांचे विपरीत अनुभव आले. पुरोगामी समाजातून बहिष्कृत पण करण्यात आलं. हे सगळं समीरनं उत्तम दाखवलंय.
ललितसोबतचं भाग्यश्रीनंही तितक्याच ताकदीनं आनंदीबाई रंगवल्या आहेत. दोघांच्याही अभिनयाची जुगलबंदी मोठ्या पडद्यावर बघायला मजा येते. जयंत सावरकर, योगेश सोमण, क्षिती जोग, गीतांजली कुलकर्णी यांनीही आपल्या भूमिका उत्तम निभवल्या आहेत.
चित्रपटात गाण्यांची तशी गरज नव्हती. परंतु योग्यप्रसंगी गाण्यांचा अचूक वापर करण्यात आलाय. चित्रपटातील सगळीच गाणी श्रवणीय आहेत. याचं श्रेय संगीतदिग्दर्शक जसराज-हृषिकेश-सौरभला जातं. योग्य ठिकाणी गाण्यांचा वापर केल्यामुळे त्यांचा इम्पॅक्ट चांगला पडतो. विशेषत: चित्रपटाच्या शेवटी येणारं अॅंथम सॉंग ‘तु आहेस ना’ भन्नाट झालंय. या गाण्यात भारतातील सगळ्याच क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा केलेला कोलाज निव्वळ अप्रतिम. या संकल्पनेसाठी समीर आणि त्याच्या टीमला हॅटस ऑफ. आतापर्यंत झी स्टुडिओजनं अनेक दर्जेदार सिनेमे दिलेत. त्यामध्ये ‘आनंदी-गोपाळ’चं नाव नक्कीच वरच्या क्रमांकावर घेतलं जाईल.
प्रत्येक नवऱ्याने आपल्या बायकोला व्हॅलेन टाईनडेचं गिफ्ट म्हणून नक्कीच हा सिनेमा दाखवावा. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो असं आपण म्हणतो, पण हा चित्रपट बघतांना एक स्त्री यशस्वी व्हावी म्हणून तिच्या नवऱ्यानं कसा लढा दिला हे बघतांना प्रेरणा मिळते.
आनंदी बाई अमेरिकेत शिक्षण घेत असतांना त्यांना टीबीनं ग्रासलं होतं. आजारावर मात करत त्यांनी आपलं शिक्षण केलं. पण एवढे कष्ट करुनही त्यांना अखेर भारतात परतल्यावर रुग्णांची सेवा करण्याचं भाग्य लाभलं नाही. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी 16 नोव्हेंबर 1886 रोजी क्षयरोगानं त्यांचं निधन झालं. चित्रपट जेव्हा संपतो तेव्हा आपण सगळेच सुन्न झालेलो असतो. अशा या सामान्य जोडप्याची असामान्य प्रेरणादायी कथा प्रत्येकानं बघायलाच हवी. ‘टीव्ही नाईन मराठी’कडून या चित्रपटाला मी देतोय चार स्टार्स 

Follow Us
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.