Ramayana : ‘रामायण’च्या कॉस्च्युमवरून सोशल मीडियावर रणकंदन, सीतेपासून कैकेयीच्या पोशाखापर्यंत वाद; डिझायनर्सनी चोख सुनावलं
'रामायण' चित्रपटाची जेवढी उत्सुकता आहे, तेवढंच त्यातील स्टारकास्टच्या लूकवरूनही चर्चा होत आहे. अनेकांना त्यातले लूक, कॉस्च्युम्स आवडले नसून, सीता झालेली अभिनेत्री साई पल्लवी तसेच कैकेयीच्या भूमिकेतील लारा दत्ता यांच्या पोशाखावरून सोशल मीडियावर विविध मत व्यक्त होत आहेत. काही नेटीजन्सनी यावरून टीकाही केली असून आता अखेर रामायणच्या टीमने मौन सोडलं आहे.

Ramayana: ‘रामायण’ या बहुचर्चित, बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यावर त्याचे भव्य व्हिज्युअल्स आणि स्टारकास्टची जोरदार चर्चा झाली. नितेश तिवारी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव झाला. मात्र त्यासोबतच या ट्रेलरवर थोडी टीकाही झालीच. कारण चित्रपटाती काही दृश्यांमुळे नव्याच वादालाही तोंड फुटले आहे. विशेषतः या चित्रपटात सीचेच्या भूमिकेत असलेली साई पल्लवीच्या आणि लारा दत्ताच्या कैकेयी यांच्या लूकनेअनेकांच्या भुवया उंचावल्या असून इंटरनेटवर मोठी चर्चा रंगली आहे. नेटकऱ्यांनी साई पल्लवीच्या ब्लाउजपासून ते लारा दत्ताच्या साडी आणि स्ट्रेट हेअरस्टाइलपर्यंत अनेक गोष्टींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “त्रेतायुगात अशा आधुनिक साड्या आणि स्टायलिश ब्लाउज होते का?”, “रामायणातील पात्रांना इतका मॉडर्न लूक का?” असे अनेक सोशल मीडियावर व्हायरल झाले. या भूमिका साकारणआऱ्या कलाकारांचे पोशाख हे रामायणातील पारंपारिक छबीशी मिळतेजुळते नाहीत असं म्हणत अनेकांनी त्यावर टीका केली.
या मुद्यावरून वाद वाढत असतानाच, चित्रपटाचे कॉस्च्युम डिझायनर्स रिंपल आणि हरप्रीत नरूला यांनी अखेर यावर मौन सोडलं आहे. “रामायण हे केवळ एक महाकाव्य नाही, तर कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेचा भाग आहे. त्यामुळे त्यातील प्रत्येक गोष्टीवर मतभेद होणार, याची आम्हाला आधीपासूनच कल्पना होती. पण आम्ही आमच्या दृष्टीकोनावर आणि मेहनतीवर पूर्ण विश्वास ठेवला” असं टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत रिंपल म्हणाल्या.
डिझायनर्सची प्रतिक्रिया समोर
सीतेच्या लूकबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की, ” मी जेव्हा सीतामाईचा विचार करते तेव्हा माझ्या मनात पुरातत्त्वीय प्रतिमा, ती छबी येत नाही. मी बालपणापासून मंदिरात आणि मनात ज्या रूपात सीतेची प्रतिमा पाहिली, तीच पडद्यावर जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे. हा निर्णय अतिशय जाणीवपूर्वक घेतला आहे” असं त्यांनी नमूद केलं.
कैकेयीच्या पोशाखावरही बोलली डिझायनर
पुढे हरप्रीत नरूला यांनी कैकेयीच्या वेशभूषेमागील विचार देखील उलगडला. कैकेयीच्या पोशाखातील हिरवा रंग मातृत्वाचे, तर गडद मरून रंग हाँ तिच्या भावनिक ताकदीचे आणि अंतर्गत संघर्षाचे प्रतीक आहे. “ती आपल्या मुलगा भरत आणि राम यांच्यातील भावनिक द्वंद्वात अडकलेली आहे. त्यामुळे प्रत्येक रंग आणि प्रत्येक डिझाइनला एक अर्थ आहे. लोक अनेकदा त्यामागील विचार न समजून लगेच निष्कर्ष काढतात,” असं म्हणत त्यांनी टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं.
त्यामुळे, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याच्या व्हिज्युअल्सवर प्रेक्षकांनी कठोर मत व्यक्त करू नयं, असं आवाहन डिझायनर्सनी केलं. नव्या पिढीसमोर ‘रामायण’ अधिक भव्य आणि प्रभावी स्वरूपात सादर करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, प्रत्येक पोशाखामागे सखोल अभ्यास आणि विचार आहे, असंही त्यांनी नमूद केलं.
‘रामायण’चा आत्ताशी ट्रेलर समोर आला आहे तरी इतकी चर्चा रंगली आहे, त्यामुळे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर ही चर्चा आणखी रंगते की प्रेक्षक सर्व प्रश्न विसरून ‘रामायण’ला भरभरून प्रतिसाद देतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दिवाळीत प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. यामध्ये रणबीर कपूर, साई पल्लवी, रवि दुबे, सनी देओल, यश, लारा दत्ता यांच्यासह अनेकांच्या भूमिका आहेत.
