लिंकअप-ब्रेकअपमधून..; अक्षय कुमारसोबतच्या नात्याबद्दल रवीना स्पष्टच म्हणाली..
नव्वदच्या दशकात अभिनेत्री रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांच्या रिलेशनशिप आणि ब्रेकअपच्या तुफान चर्चा होत्या. हे दोघं आता आपापल्या आयुष्यात पुढे गेले असून नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रवीना अक्षयबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली.

नव्वदच्या दशकात बॉलिवूड इंडस्ट्रीत अभिनेता अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांच्या अफेअरची जोरदार चर्चा होती. 1995 पासून दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. इतकंच नव्हे तर हे दोघं एकमेकांशी लग्नही करणार होते, परंतु काही कारणास्तव त्यांचं लग्न मोडल्याचं म्हटलं जातं. नंतर अक्षयच्या आयुष्यात शिल्पा शेट्टीची एण्ट्री झाली. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रवीना याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांच्यासोबत तिचं नातं आता कसं आहे, याबद्दल तिने सांगितलं आहे.
काय म्हणाली रवीना?
‘झूम’च्या पॉडकास्ट मुलाखतीत रवीना म्हणाली, “मला असं वाटतं की आता आम्ही सर्वजण चांगले मित्र बनलो आहोत. त्यावेळी आम्ही तरुण होतो. आम्ही सर्वजण एकाच इंडस्ट्रीत आहोत. या सर्व गोष्टींचा सामना कोणी केला नसेल? लिंकअप-ब्रेकअप-रिलेशनशिप यांच्यासारख्या गोष्टींमधून कोण गेलं नाही? आज मी आणि अक्षय चांगले मित्र आहोत. शिल्पासुद्धा माझी मैत्रीण आहे. आमच्याच चांगली मैत्री आहे आणि आम्ही सर्वजण आपापल्या आयुष्यात पुढे गेलो आहोत. आम्ही आमच्या कुटुंबासाठी, मुलाबाळांसाठी खुश आहोत. मी आणि अक्षयने मिळून ‘वेलकम 3’मध्ये काम केलं आहे आणि संपूर्ण टीमसोबत आम्ही खूप एंजॉय केलं. शूटिंगदरम्यान आम्ही खूप मजा केली, खूप हसलो. आम्हाला पुन्हा एकत्र काम करून खूप चांगलं वाटलं. तुम्हाला मोठं व्हावं लागतं, मॅच्युअर व्हावं लागतं. आम्ही सर्वजण एकमेकांसाठी खुश आहोत.”
रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांचा ‘वेकलम टू द जंगल’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये दिशा पटानी, सुनील शेट्टी, लारा दत्ता, जॅकलिन फर्नांडिस, राजपाल यादव, श्रेयस तळपदे आणि अर्शद वारसी यांच्याही भूमिका आहेत.
अक्षय आणि रवीनाने 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मोहरा’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. त्या काळात या दोघांची जोडी सर्वाधिक चर्चेत होती. त्यांच्या अफेअरचे किस्से आजही चवीने चघळले जातात. 90 च्या दशकात या दोघांचा साखरपुडाही झाल्याच्या चर्चा होत्या. मात्र काही कारणास्तव त्यांचं लग्न मोडलं. नंतर अक्षयने 2001 मध्ये ट्विंकल खन्नाशी लग्न केलं. तर रवीनाने 2004 मध्ये अनिल थडानीशी लग्नगाठ बांधली.
