सलमान खानचं सुपरहिट गाणं, जे ठरलं अपशकुनी, 35 वर्षांपासून कधीच कोणत्या लग्नात वाजलं नाही, कारण ऐकून..
सलमान खानच्या चित्रपटातील प्रसिद्ध गाणं, जे मुलींच्या विदाईवर आहे आधारित. जे सुपरहिट ठरून देखील त्याला अपशकुनी म्हटलं. 35 वर्षांपासून कधीच कोणत्या लग्नात वाजले नाही.

Bollywood Song : मुलीची विदाई हा प्रत्येक कुटुंबासाठी आनंद आणि भावनांनी भरलेला क्षण असतो. एका बाजूला मुलीच्या नव्या आयुष्याची सुरुवात होत असल्याचा आनंद असतो, तर दुसऱ्या बाजूला ती माहेर सोडून जाणार असल्याची हुरहूरही असते. त्यामुळेच बॉलिवूडमधील अनेक विदाईवर आधारित गाण्यांनी वर्षानुवर्षे लग्नसोहळ्यांमध्ये विशेष स्थान मिळवले आहे. ‘बाबुल की दुआएं लेती जा’सारखी गाणी आजही विदाईच्या वेळी वाजवली जातात आणि वातावरण भावूक करून टाकतात.
मात्र हिंदी चित्रपटसृष्टीत एक असे विदाई गीत आहे, जे प्रचंड लोकप्रिय झाले, सुपरहिट ठरले, पण तरीही लग्नसमारंभातील विदाईच्या वेळी ते लावले जात नाही. हे गाणे प्रेक्षकांच्या मनाला भिडले, परंतु त्यातील वेदनादायी आशय आणि भावनिक पार्श्वभूमीमुळे लोकांनी ते प्रत्यक्ष विदाईच्या प्रसंगी वाजवणे टाळले.
1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या सनम बेवफा या चित्रपटातील ‘मेरी जान चली दुश्मन के घर’ या गाण्याबद्दल. या चित्रपटात सलमान खान आणि चांदनी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटातील हे गाणं अत्यंत भावनिक प्रसंगावर चित्रित करण्यात आले होते आणि त्याने प्रेक्षकांच्या मनात खोलवर घर केले.
गाण्याची भावनिक पार्श्वभूमी
‘सनम बेवफा’च्या कथानकात दोन कुटुंबांमधील तीव्र वैर आणि शत्रुत्व दाखवण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर नायिकेचे लग्न होते आणि तिच्या विदाईचा प्रसंग अत्यंत हृदयस्पर्शी पद्धतीने सादर करण्यात आला आहे. गाण्यात वडील आपल्या मुलीला सासरी पाठवत असतात, पण त्यांच्या मनात एक वेदना असते. त्यांना वाटते की त्यांची मुलगी अशा घरात जात आहे, ज्याला ते स्वतःचे मानू शकत नाहीत. त्यामुळे या गाण्यात केवळ विरह नाही तर असहाय्यता, दुःख आणि मनातील संघर्षही दिसून येतो. याच भावनिक मांडणीमुळे हे गाणे प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करून गेले.
लग्नातील विदाईत का झाले नाही लोकप्रिय?
सामान्यतः विदाई गीतांमध्ये मुलीच्या सुखी संसारासाठी शुभेच्छा, आशीर्वाद आणि नव्या जीवनाच्या सुरुवातीची आशा व्यक्त केली जाते. परंतु ‘मेरी जान चली दुश्मन के घर’ या गाण्यात आनंदापेक्षा विभक्त होण्याचे दुःख आणि परिस्थितीची वेदना अधिक ठळकपणे मांडली गेली आहे.
विशेषतः ‘दुश्मन के घर’ हा शब्दप्रयोग अनेकांना अस्वस्थ करणारा वाटला. लग्नासारख्या मंगल प्रसंगी अशा प्रकारच्या नकारात्मक भावनेशी जोडलेले शब्द योग्य वाटत नसल्याने हे गाणे प्रत्यक्ष विदाईच्या विधींमध्ये स्थान मिळवू शकले नाही. परिणामी, गाणे सुपरहिट ठरले असले तरी ते लग्नसमारंभातील पारंपरिक विदाई गीत बनू शकले नाही.
