Samay Raina : करिअर संपवणारी कॉन्ट्रोव्हर्सी ते जबरदस्त कमबॅक.. समय रैनाने कसं बदललं स्वत:चं नशीब?
करिअरमधील सर्वांत मोठ्या वादानंतर कॉमेडियन समय रैनाने जबरदस्त कमबॅक केलं आहे. हा कमबॅक काही साधासुधा नाही तर त्याचा व्हिडीओ जगभरात सर्वाधिक पाहिला गेला आहे. कॉन्ट्रोव्हर्सीनंतर समयने त्याच्या आयुष्याची संपूर्ण कथा पुन्हा नव्याने कशी लिहिली, ते जाणून घ्या..

कंटेंट क्रिएशन आणि सोशल मीडियाच्या विश्वात वेळेचं फार महत्त्व असतं, पण त्याहीपेक्षा अधिक महत्त्व विश्वास, पडत्या काळातही तुम्ही स्वत:ला कसं सावरता आणि त्यानंतर स्वत:ची कथा इतरांपेक्षा वेगळी कशी लिहिता, याला असतं. स्टँडअप कॉमेडियन समय रैनाने फेब्रुवारी 2025 मध्ये त्याच्या करिअरमधील आणि आयुष्यातील सर्वांत कठीण काळाचा सामना केला होता. ‘इंडियाज गॉट लेटंट’ या त्याच्या शोमध्ये युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहाबादियाने अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. ज्यानंतर देशभरात त्यांच्याविरोधात आणि शोविरोधात संतापाची लाट उसळली होती. अर्थातच समय रैनाला याचा सर्वांत मोठा फटका बसला होता. अनेक ब्रँड्सने त्याच्यापासून फारकत घेतली. ‘मिंत्रा’ने व्हॅलेंटाइन डेचा कोलॅबरेशन रद्द केला, ‘केएफसी’ने समयसोबत बनवलेला रील कॅम्पेन काढून टाकला, अनेक स्पॉन्सरशिप रद्द झाले. समय रैनाच्या करिअरला कायमची खीळ बसू शकते, असं त्यावेळी सर्वांना वाटलं होतं. पण हार मानणार तो समय रैना कसला? वादानंतर जाहीररित्या माफी मागणं किंवा दीर्घकाळापर्यंत शांत राहणं या नेहमीच्या मार्गाचा त्याने अवलंब केला नाही. वर्षभरापेक्षा जास्त काळ तो प्रसिद्धीपासून दूर राहिला आणि ‘इंडियाज गॉट लेटंट’चे सर्व एपिसोड युट्यूबवरून काढून काढले. त्यानंतर ‘स्टिल अलाइव्ह’ (Still Alive) या त्याच्या पहिल्या स्टँडअप स्पेशलसह त्याने कमबॅक केला.
समय रैनाचा कमबॅक
समय रैनाचा हा कमबॅक काही साधासुधा नाही. त्याचा हा व्हिडीओ आता युट्यूबवर सर्वाधिक पाहिला गेलेला व्हिडीओ ठरला आहे. युट्यूबर त्याला 53.4 मिलियन (दशलक्ष) व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ इतका का पाहिला गेला असेल? तर अर्थात त्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे ‘कंटेंट’. वादादरम्यान आणि त्यानंतर गेल्या 14 महिन्यांत त्याच्या आयुष्यात काय काय घडलं, बातम्यांमध्ये आणि सोशल मीडियावर जे दिसत होतं त्यामागचं खरं चित्र काय होतं आणि या सर्वांचा त्याच्या आयुष्यावर काय परिणाम झाला हे सर्व सांगताना समयने प्रेक्षकांना फक्त हसवलंच नाही तर त्यांच्या डोळ्यात पाणीसुद्धा आणलं. हा कंटेंट तरुणाईशी 101% कनेक्ट झाला आणि सर्वांनीच त्याची पाट थोपटली. आता या सर्वांची सुरुवात कुठून झाली, ते पाहुयात..
सुरुवात कुठून झाली?
जून 2024 मध्ये सुरू झालेल्या ‘इंडियाज गॉट लेटंट’ या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. परंतु फेब्रुवारी 2025 मध्ये एका वादग्रस्त एपिसोडमुळे सर्वकाही बदललं आणि देशभरात मोठा वाद निर्माण झाला. पॉडकास्टर रणवीर अलाहाबादियाने त्यात एका स्पर्धकाला असा प्रश्न विचारला, जो प्रचंड आक्षेपार्ह मानला गेला. त्याच्या क्लिप्स वेगाने सोशल मीडियावर पसरल्या आणि त्यानंतर देशभरातून शोविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. या प्रतिक्रिया फक्त सोशल मीडियापुररत्या मर्यादित नव्हत्या, तर देशातील विविध राज्यांमध्ये समय रैना, रणवीर अलाहाबादिया, अपूर्व मुखिजा आणि आशिष चंचलानी यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाले. महाराष्ट्र सायबर सेलने या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि राष्ट्रीय महिला आयोगानेही याची दखल घेतली. हा शो अत्यंत असंवेदनशील आणि अश्लील असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. या वादात राजकारण्यांनीही उडी घेतली.
या वादादरम्यान अपूर्व मुखिजाला थेट बलात्काराच्या धमक्या येत होत्या. अखेर समय रैनाने युट्यूबवरून शोचे सर्व एपिसोड्स काढून टाकले आणि माफी मागितली. रणवीरनेही माफीनामा प्रसिद्ध केला. सर्वोच्च न्यायालयाने या तिघांना दिलासा दिला असला तरी या संपूर्ण घटनेनं त्यात सामील असलेल्या प्रत्येकावर खोलवर परिणाम केला होता.
प्रेक्षकांना हसवलं अन् रडवलंही
पण जी घटना अनेकांसाठी करिअर संपवणारी ठरू शकली असती, ती समय रैनासाठी मात्र नरेटिव्हवरील नियंत्रणाचा एक उत्कृष्ट नमुना ठरली. ‘स्टिल अलाइव्ह’ या कमबॅकच्या शोमध्ये त्याने हा वाद टाळण्याचा प्रयत्न केला नाही. तर मार्मिक विनोद आणि भावनिकतेचा मिलाफ साधत सर्व गोष्टी प्रेक्षकांसमोर मांडल्या. तो संपूर्ण संघर्षाचा काळ त्याने एक तास 21 मिनिटांच्या स्टँडअपमध्ये सांगितला. राजकारणी, सेलिब्रिटी आणि इतर कॉमेडियन्सकडून झालेली टीका, कायदेशीर दबाव आणि प्रकरणात सामील असलेल्या प्रत्येकावर झालेला भावनिक आघात.. या सर्व गोष्टींची गुंफण करत त्याने हा शो सादर केला. मनातील अपराधीपणाच्या भावनेचं वर्णन करताना तो मंचावर भावूकही झाला. विशेष म्हणजे हा सर्व दिखावा नव्हता, तर समयने त्या संपूर्ण वादाची जबाबदारी स्वीकारली होती. हा विशेष भाग केवळ विनोद नव्हता, तर तो एक भावनिक विरेचन होता. म्हणूनच प्रेक्षकांच्या मनाला तो सर्वाधिक भिडला आणि पुन्हा एकदा अनेकांनी त्याला आपलंसं केलं.
View this post on Instagram
समयच्या कमबॅकचं कौतुक का?
समयचं हे सादरीकरण इतकं प्रभावी होतं की ज्या लोकांना ‘इंडियाज गॉट लेटंट’ आणि त्यातील कमरेखालच्या विनोदाबद्दल, रोस्टिंगबद्दल आक्षेप होता, त्यांनासुद्धा त्याच्या काही गोष्टी पटू लागल्या. ज्याप्रकारे त्याने स्वत:ला सावरलं आणि पुन्हा प्रेक्षकांसमोर सत्य बोलण्याचं धाडस केलं, त्यासाठी अनेकांनी त्याचं कौतुक केलं. ‘स्टिल अलाइव्ह’ या शोमध्येही शिव्यांचा भडीमार होताच. पण आपली बाजू प्रभावीपणे कशी मांडली जाऊ शकते, याचं उत्तम उदाहरण समयने सर्वांसमोर ठेवलं. या शोच्या शेवटी त्याने ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या दुसऱ्या सिझनविषयीही मोठी हिंट दिली होती. आता हा दुसरा सिझन पहिल्यापेक्षाही अधिक चर्चेत येईल, यात काही शंका नाही. कारण समयने त्याच्या प्रेक्षकांचा विश्वास पुन्हा मिळवला आहे आणि स्वत:ची कथा त्याने अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे.
समर्थन न करणारेही अनेक पण..
अजूनही इंटरनेटवर आणि त्यावर नसणाराही असा एक मोठा वर्ग आहे, ज्याला समय रैना आणि त्याच्यासारखे कॉमेडियन, इन्फ्लुएन्सर, पॉडकास्टर अजूनही पटत नाहीत. विनोदाच्या नावाखाली अश्लीलता आणि असभ्यता पसरवली जात असल्याचा आरोप करणारे आजही अनेक आहेत. अशा प्रकारच्या शोमध्ये बोलल्या जाणाऱ्या गोष्टींचं समर्थन नक्कीच केलं जाऊ शकत नाही, परंतु या सर्व गोष्टींची एक वेगळी बाजू आहे असं म्हणत त्यांना पाठिंबा देणारेही असंख्य जण आहेत, याकडे कानाडोळाही केला जाऊ शकत नाही. हजारो रुपये खर्च करून अशा शोचं तिकिट विकत घेणाऱ्यांचीही संख्या अधिक आहे. पण या सर्वांचं उत्तर अखेर समयच्या ‘स्टिल अलाइव्ह’ या व्हिडीओमध्येच दडलं आहे. जेव्हा एखादा कॉमेडियन किंवा कंटेंट क्रिएटर असं काही वादग्रस्त, आक्षेपार्ह वक्तव्य करतो, तेव्हा त्याच्या विरोधात असलेला फॉलोअर, प्रेक्षक, चाहता त्यांच्यापासून आपसूकच दुरावला जातो. एखादा प्रेक्षक किंवा चाहता गमावणं हीच त्यांच्यासाठी शिक्षा असते. इथे या गोष्टीकडेही दुर्लक्ष करता येणार नाही की, समयने त्याच्या गमावलेल्या काही प्रेक्षकांना आणि चाहत्यांना त्याच्या या कमबॅक शोमुळे परत मिळवलं आहे. समय नेमका कसा आहे, त्याचा शो कसा आहे, हे प्रेक्षकांना आता अधिक स्पष्टपणे कळू लागलं आहे. त्यामुळे एकाअर्थी कठीण काळावर मात करून त्याने स्वत:वर मिळवलेला हा विजयच आहे.
