‘जय महाराष्ट्र…’ म्हणत संजय दत्तचा प्रताप सरनाईकांना फोन, मराठी भाषेवरील वादानंतर मागितली माफी, नेमकं काय घडलं?
‘जय महाराष्ट्र...’ म्हणत संजय दत्तचा प्रताप सरनाईक यांना फोन; मराठी वक्तव्यावर दिलं स्पष्टीकरण. मागितली माफी. नेमकं काय घडलेलं?

अभिनेता संजय दत्तच्या एका वक्तव्यामुळे सध्या मराठी भाषेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. ठाण्यातील दहीहंडी कार्यक्रमादरम्यान संजय दत्तने मराठी भाषेबाबत केलेल्या एका मजेशीर वक्तव्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. त्यानंतर आता संजय दत्तने महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना फोन करून आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. आपलं वक्तव्य केवळ विनोदाच्या स्वरूपात होतं असं सांगतानाच त्यातून कोणताही चुकीचा संदेश गेला असेल तर त्याने माफीही मागितली.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रताप सरनाईक एका बैठकीत व्यस्त असताना त्यांना संजय दत्तचा फोन आला. विशेष म्हणजे, फोनवरील संभाषणाची सुरुवातच संजय दत्तने ‘प्रताप भाई, जय महाराष्ट्र…’ असं मराठीत बोलून केली.
यावेळी त्याने ठाण्यातील दहीहंडी कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत आपली भूमिका स्पष्ट केली. संजय दत्त म्हणाला की, कार्यक्रमात त्याने विनोदाच्या अंदाजात ‘मी सहा वर्षे येरवडा जेलमध्ये राहूनही मराठी शिकलो नाही’ असं म्हटलं होतं. मात्र, त्याच्या या वक्तव्याचा गंभीर अर्थ घेतला गेला आणि त्यातून चुकीचा संदेश सोशल मीडियावर पसरला.
‘माझी मराठी चांगली आहे, भावना दुखावल्या असतील तर माफ करा’
संजय दत्तने प्रताप सरनाईक यांच्याशी बोलताना आपण मराठी भाषा चांगल्या प्रकारे जाणत असल्याचं सांगितलं. तसेच त्याच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील किंवा चुकीचा संदेश गेला असेल तर त्याबद्दल त्याने दिलगिरी व्यक्त केली.
‘मला चांगली मराठी येते. माझ्या बोलण्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील किंवा चुकीचा संदेश गेला असेल, तर मी माफी मागतो. माझं कुटुंब मुंबईकर आहे. मी याच मातीत वाढलो आहे आणि महाराष्ट्राने मला खूप काही दिलं आहे,’ अशी भूमिका संजय दत्तने मांडल्याची माहिती आहे.
दहीहंडीतील वक्तव्यावरून सोशल मीडियावर टीका
प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात येणारी ठाण्यातील दहीहंडी ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध दहीहंडींपैकी एक मानली जाते. यंदाच्या कार्यक्रमालाही मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटींसह राजकीय नेते आणि व्यावसायिकांनी उपस्थिती लावली होती. संजय दत्तच्यासोबत सुनील शेट्टी आणि भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्ती कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.
मराठी भाषेबाबत प्रताप सरनाईक यांनी यापूर्वी घेतलेल्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेक सेलिब्रिटींनी मराठीतून भाषण केलं होतं. याच दरम्यान संजय दत्तने केलेल्या ‘मराठी शिकता आली नाही’ या वक्तव्याने सोशल मीडियावर वेगळंच वळण घेतलं. काही नेटकऱ्यांनी संजय दत्तच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत टीका केली.
