ज्या मातेच्या कुशीतून आपण जन्म घेतो तिचे…, ज्योती मेटे यांनी मनोज जरांगेंना सुनावलं, मराठा आरक्षणाबाबत रोखठोक भूमिका
मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज तेरावा दिवस आहे. त्यांनी मुंबईला जाणार असल्याची देखील घोषणा केली आहे, दरम्यान या आंदोलनावर आता ज्योती मेटे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणावर आक्रमक भूमिका घेतली आहे. ते उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज 13 वा दिवस आहे. त्यांनी मुंबईत येण्याचा देखील इशारा दिला आहे. त्यासाठी 12 सप्टेंबरला दुपारी बारा वाजता त्यांनी अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधवांची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये मुंबईतील आंदोलनाची तारीख जाहीर होणार आहे. दरम्यान पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना मनोज जरांगे पाटील यांनी काही राजकीय नेत्यांचा एकेरीमध्ये उल्लेख केला होता. मनोज जरांगे पाटील यांच्या भाषेवरून आता शिवसंग्रामच्या नेत्या डॉक्टर ज्योती मेटे यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर परखडपणे आपली भूमिका जाहीर केली आहे.
नेमकं काय म्हणाल्या ज्योती मेटे?
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील 15 मागण्यांच्या बाबत तपशिलाने विचार केला तर यातील बारा मागण्या पूर्ण झाल्याचे मला दिसते. याबरोबरच शासनाने चर्चेची सर्व दारे खुली ठेवलेली आहेत. आपण जेव्हा आंदोलनाचे नेतृत्व करतो तेव्हा त्या आंदोलनाची यशस्वी असेल अथवा अयशस्वी असेल जी काय असेल ती सांगता होणे गरजेचे असते. जरांगे पाटील यांनी प्रत्येक मागणीचा तपशिलाने विचार करावा आणि मगच काय तो निर्णय घ्यावा असे डॉक्टर ज्योती मेटे यांनी म्हटले आहे.
याबरोबरच जरांगे पाटील यांच्या भाषेबाबतही त्यांनी वक्तव्य केले आहे. गावगाडा चालला पाहिजे. जातीय सलोखा कायम राहिला पाहिजे या मताची मी आहे. आम्ही जेव्हा नेतृत्व करतो तेव्हा आमच्यावर जबाबदारी असते. आमचे वर्तन जसे असेल तसंच अनुयायांचे देखील असते. ज्या मातेच्या कुशीतून आपण जन्म घेतो तिचे संस्कार सार्थ ठरतील असेच वर्तन आपलं असलं पाहिजे. असे म्हणत डॉक्टर ज्योती मेटे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
12 सप्टेंबर रोजी बैठक
दरम्यान जरांगे पाटील यांनी बारा सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटीमध्ये बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये अंतरवाली सराटीवरून मुंबईला जाण्याच्या तारखेरी घोषणा करण्यात येणार आहे. या बैठकीकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
