सेन्सार बोर्डा, तुला काय कळणार आमच्या व्यथा? काय पुसतो, कोण नामदेव ढसाळ? विद्रोहाच्या मशाली अजून भकभकणार
'चल हल्ला बोल' या चित्रपटातील नामदेव ढसाळ यांच्या कवितांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला. पण त्यानंतर त्यांनी नामदेव ढसाळ कोण? असा प्रश्न करत सर्वांना चकीत केले.

गेल्या काही दिवसांपासून ‘चल हल्ला बोल’ हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाची कथा दलित पँथर आणि युवा क्रांती दल या चळवळींवर आधारित असल्यामुळे सर्वांचे विशेष लक्ष या सिनेमाकडे लागले होते. या चित्रपटासाठी बंडखोर कवी आणि दलित पॅथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांनी कविता लहिल्या होत्या. त्या कवितांचा वापर सिनेमात करण्यात आला होता. पण आता सेन्सॉर बोर्डाने या कवितांवर आक्षेप घेतल ‘कोण ढसाळ?’ असे म्हटले आहे.
‘चल हल्ला बोल’ हा चित्रपट १ जुलै २०२४ रोजी मान्यतेसाठी सेन्सॉर बोर्डकडे सबमिट करण्यात आला होता. पण चित्रपटातील कवितांमध्ये शिव्या आणि अश्लीलता असल्याचे मत सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी मांडले. त्यानंतर या कविता नामदेव ढसाळ यांनी लिहिल्याची माहिती देण्यात आली होती. त्यावर अधिकाऱ्यांनी, ‘कोण ढसाळ? आम्ही ओळखत नाही’ असे उत्तर दिल्याचे समोर आले आहे.
‘चल हल्ला बोल’ हा चित्रपट ६ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र, सेन्सॉर बोर्डाने अक्षेप घेतल्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. हा सिनेमा रिवायजिंग कमेटीकडे दिला असून त्याची रीतसर फी देखील भरण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही सेन्सॉर बोर्ड कोणताच प्रतिसाद देत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत अनेक पत्रव्यवहार केले, प्रत्यक्षात ऑफिस भेट दिल्या परंतु ‘चल हल्ला बोल’साठी कोणता ऑफिसर वेळ देत नसल्याची खंत दिग्दर्शक महेश बनसोडे यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. सेन्सॉर बोर्डाच्या या वर्तवणुकीबाबत दलित समाजात संतापाची लाट असून लवकरच दलित समुदयाकडून सेन्सॉर बोर्डावरच ‘चल हल्ला बोल’ करत आंदोलन करण्याचा इशारा दलित संघटनानी दिला आहे.
‘चल हल्ला बोल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश बनसोडे यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा ही दलित पँथर आणि युवा क्रांती दल या चळवळींवर आधारीत आहे. हा चित्रपट डिसेंबर २०२४मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र, सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतल्यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर गेले आहे.
