Vadh Review: हतबल आईवडिलांकडून कर्ज देणाऱ्याची हत्या, गिरणीत दळतात हाडं; श्वास रोखून धरणारा 1 तास 50 मिनिटांचा सिनेमा
संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांच्या भूमिका असलेल्या 'वध' या चित्रपटाचा दुसरा भाग नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यापूर्वी या चित्रपटाचा पहिला भाग कसा होता, हे जाणून घ्या.. या चित्रपटातील ट्विस्ट तुम्हालाही चक्रावून सोडतील.

‘वध 2’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून यामध्ये संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांच्या मुख्य भूमिका आहेत. वधचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत असताना 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वध’ या चित्रपटावर एक नजर टाकुयात. हा चित्रपट प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हा एक असा चित्रपट आहे, जो मनाला स्पर्श करतो आणि विचार करायला भाग पाडतो. संजय मिश्रा आणि नीना गुप्ता या जोडीने अत्यंत दमदार भूमिका साकारल्या असून त्यांचं अभिनय पाहून डोळे पाण्यावल्याशिवाय राहणार नाही. अक्षरश: जिवंत वाटावी अशी कथा त्यांनी मोठ्या पडद्यावर सादर केली आहे.
ग्वालियरच्या एका छोट्या मोहल्ल्यात शंभूनाथ मिश्रा (संजय मिश्रा), निवृत्त शिक्षक आणि त्यांची पत्नी मंजू (नीना गुप्ता) राहतात. त्यांचा मुलगा अमेरिकेत शिकायला गेला आहे आणि त्याच्या शिक्षणासाठी घर शंभूनाथ आणि मंजू यांनी घर गहाण ठेवून कर्ज घेतलं होतं. परंतु मुलगा? तो तर दर महिन्याला पैसे पाठवत नाही. मग आता कर्ज वसुलीसाठी प्रजापती पांडेय (सौरभ सचदेवा) दर महिन्याला त्यांच्या घरासमोर येतो आणि त्यांना धमकी देतो. त्यांच्याकडून घर हिसकावून घेण्याचा इशारा देतो. पोलीससुद्धा त्याच्याच बाजूने असतात. इन्स्पेक्टर शक्ती सिंहची (मानव विज) भूमिकासुद्धा यात दमदार आहे. जो थोडा भ्रष्ट आणि थोडा असहाय्य असतो.
चित्रपटाच्या मध्यांतरापूर्वीची कथा अत्यंत वेदनादायी असून काही दृश्ये पाहताना अक्षरश: तळपायाची आग मस्तकात जाते. सर्वसामान्य माणसाची हतबलता, मुलाचा निष्काळजीपणा, समाजाची उदासिनता.. हे सर्व काही कोणत्याही अति ड्रामाशिवाय यात दाखवलं गेलंय. संजय मिश्राच्या डोळ्यांत एका पित्याच्या वेदना आणि परिस्थितीमुळे हतबल झालेला पती अशा दोन्ही छटा दिसतात. नीना गुप्ता गप्प राहून सर्वकाही सहन करत असते. परंतु जेव्हा ती बोलते, तेव्हा तिचे शब्द मनाला भिडतात. या दोघांचं अभिनय इतकं सहज आहे की चित्रपट पाहताना हे जोडपं जणू आपल्या शेजारीच राहतात असं वाटू लागतं.
मध्यांतरानंतर चित्रपटात एक अशी घटना घडते, ज्यामुळे सर्वकाही बदलून जातं. तो शांत शिक्षक असतो, तो आता पूर्णपणे बदलतो आणि तिथूनच थ्रिलर मोड ऑन होतो. पोलिसांचा तपास, लपवण्याचा प्रयत्न, तणाव.. सगळं इतकं तीव्र दाखवलं गेलंय की प्रेक्षक थक्क होतात. कधीकधी यातील सीन ‘दृश्यम’सारखे वाटतात. तरीही ‘वध’ आपली वेगळी ओळख कायम ठेवतो. मुद्दा इथे फक्त गुन्ह्यावर पांघरूण घालण्याचा नाही तर नैतिकतेचाही आहे.
जसपाल सिंग संधू आणि राजीव बर्नवाल यांचं दिग्दर्शन उत्तम आहे. पण खरी कमाल कलाकारांच्या अभिनयात आहे. संजय मिश्राने भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे. तर नीना गुप्तासुद्धा तोडीस तोड आहेत. सौरभ सचदेवाने खलनायकाची भूमिका अत्यंत चोख साकारली आहे. वास्तववादी चित्रपट, थ्रिलर आणि चांगला अभियन अनुभवायचा असेल तर वध हा चित्रपट आवर्जून पाहावा असा आहे.
