Imran Khan: इम्रान खान यांना तुरुंगातच ठार मारण्याचा कट, मुलाचा कुणावर आरोप? थेट नाव घेत…
Imran Khan Pakistan: माजी क्रिकेटर आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविषयी एक मोठा दावा करण्यात येत आहे. खान यांना तुरुंगातच ठार मारण्याचा कट रचल्याचा आरोप त्यांच्या मुलाने केला आहे. त्यांच्या या आरोपाने सुटकेच्या प्रयत्नांना धक्का लागल्याचे मानले जात आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि माजी क्रिकेट कर्णधार इम्रान खान यांना तुरुंगातच ठार मारण्याचा कट आखल्याचा आरोप त्यांच्या मुलांनीच केला आहे. कासिम आणि सुलेमान खान या त्यांच्या मुलांनी पाकिस्तान सरकारवर गंभीर आरोप केला आहे. तुरूंगातच त्यांच्यावर विष प्रयोग अथवा हत्येचा कट रचल्या जात असल्याचा आरोप मुलांनी केला आहे. द टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, इम्रान यांच्या दोन्ही मुलांनी वडिलांच्या तुरुंगातील सुरक्षेवरून मोठी चिंता व्यक्त केली आहे. शहबाज शरिफ सरकार त्यांच्या वडिलांना ठार मारण्याचा कट रचत असल्याचा आरोप मुलांनी केला आहे. सरकारच्या या धोरणामुळे वडिलांच्या जीवाला मोठा धोका असल्याचा दावा त्यांनी केला.
जेमिमा गोल्डस्मिथची कासिम आणि सुलेमान ही मुलं
73 वर्षीय इमरान खान हे गेल्या 3 वर्षांपासून तुरुंगात आहेत. ऑगस्ट 2022 मध्ये त्यांना पंतप्रधान पदावरून हटवण्यात आले होते. त्यांच्यावर कायदेशीर खटले सुरू आहेत. या खटल्यांमध्ये ते सध्या तुरुंगात आहेत. इम्रान खान यांचे कासिम आणि सुलेमान हे मूलं आहेत. यापूर्वीची पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ यांच्यापासून त्यांना दोन मूलं झाली आहेत. दोन्ही मुलांनी गेल्या काही वर्षांपासून तुरुंगात असलेल्या वडिलांविषयी मोठी चिंता व्यक्त केली आहे. तर यापूर्वी त्यांच्या बहिणींनी इम्रान खान हे जिवंत आहेत की नाही? यावरच प्रश्न उपस्थित केला होता. आपल्याला सलग तीनदा त्यांना भेटण्यास मज्जाव करण्यात आल्याचा आरोप इम्रान यांच्या बहिणींनी केला होता.
ताज्या आरोपात इम्रान यांच्या मुलांनी तुरूंगातील परिस्थितीवर आंतरराष्ट्रीय मंचावर आवाज उठवला आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, इम्रान खान हे चर्चित चेहऱ्यांपैकी एक आहेत. पण त्यांना तुरुंगात अमानवीय वागणूक देण्यात येत आहे. त्यांना राजकीय कैद्यांशी संबंधित कोणत्याही सोयी-सुविधा दिल्या जात नाहीत. त्यांना नातेवाईकांना सु्द्धा भेटू दिलं जात नाही. यापूर्वी त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून मोठा हंगामा केला होता. 1992 मध्ये इम्रान खान यांच्या नेतृत्वात पाकिस्तानने क्रिकेट विश्वकप जिंकला होता. काही वर्षांपूर्वी त्यांनी पाकिस्तानच्या राजकारणात उडी घेतली. आघाडी सरकारच्या काळात ते पंतप्रधान झाले.
राजकीय द्वेषातून कारवाई
पाकिस्तान तहरीक -ए-इन्साफ, PTI हा पक्ष त्यांनी स्थापन केला होता. या पक्षाने पाकिस्तानच्या राजकारणाला एक वेगळं वळण दिले होते. या काळात भारताशी फारसे संबंध सुधारले नसले तरी अंतर्गत तरुणाईला राजकारणात मोठे स्थान मिळाले होते. आताचे शरीफ सरकार इम्रान खान यांच्याविरोधात सुडबुद्धीने वागत असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला आहे. भारतीय क्रिकेटर्ससह जागतिक खेळाडूंनी इम्रान खान यांच्या सुटकेसाठी दबाव वाढवला आहे.
