India Tariffs : अमेरिकेने भारताचा केला मोठा गेम? टॅरिफ कमी केला पण…ट्रम्प यांच्या अधिकाऱ्याच्या दाव्याने खळबळ!
भारत आणि अमेरिका यांच्यात ऐतिहासिक असा व्यापार करार झाला आहे. यामुळे अमेरिकेतील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचा दावा केला जातोय.

India America Trade Deal : अमेरिकेने भारतावरील टॅरिफ अर्थात आयातशुक्ल 25 टक्क्यांवरून थेट 18 टक्क्यांपर्यंत कमी केले आहे. त्यामुळे आता भारताला अमेरिकेसोबतच्या व्यापारात फायदा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे हा टॅरिफ कमी करण्याच्या बदल्यात भारत आपला अमेरिकेसोबतचा व्यापार वाढवणार आहे. तशी सहमती या व्यापार करारात झाल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. हा व्यापार करार झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील सोशल मीडियावर पोस्ट करून ट्रम्प यांचे आभार मान्य केले आहेत. दरम्यान, आता भारत आणि अमेरिका यांच्यात हा ऐतिहासिक व्यापार करार तसेच भारतावरील टॅरिफ कमी केल्यानंतर अमेरिकेकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. या करारानंतर आता अमेरिकेतील शेतकरी मालामाल होणार आहेत, अमेरिकेतील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल भारतात जास्त प्रमाणात निर्यात केला जाईल, असा दावा केला जात आहे. यावर भारतानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
नेमका काय दावा केला जातोय?
अमेरिकेच्या कृषी विभागाच्या सचिव ब्रुक रोलिंस यांनी त्यांच्या एक्स खात्यावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या व्यापार करारावर भाष्य केले आहे. या करारामुळे अमेरिकेच्या शेतकऱ्यांना, अमेरिकेतील ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल, असे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या कृषी उत्पादनांची भारतातील निर्यात वाढेल, असा दावादेखील त्यांनी केला आहे. या करारामुळे ग्रामीण अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत पैसे वाढतील. भारताच्या मोठ्या बाजारपेठेत अमेरिकेच्या कृषी उत्पादनांची निर्यात वाढेल. 2024 साली अमेरिकेची भारतासोबतची कृषीविषयक व्यापार तूट 1.3 अब्ज डॉलर्स होती, अशी आकडेवारीही त्यांनी दिली. तसेच भारताची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे भारताची बाजारपेठ ही अमेरिकन कृषी उत्पादनांसाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या करारामुळे ही व्यापार तूट कमी होईल, असा दावा त्यांनी केला आहे.
भारताने केली भूमिका स्पष्ट
दरम्यान, ब्रुक रोलिंस यांचा दावा खरा असेल आणि अमेरिकेतील कृषी उत्पादनांची भारतीय बाजारपेठेतील निर्यात वाढणार असेल तर भारतीय शेतकऱ्यांना त्याचा फटका बसणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे भारताने मात्र भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उच्चपदस्थ सूत्रांच्या माहितीनुसार भारतीय कृषी उत्पादनांविषयी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. कृषी आणि डेअरी उत्पादनांवरही तडजोड होणार नाही, असे भारताने स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
