इराण-इस्रायल युद्ध पेटले, भारतीयांची सुटका कशी होणार? मोठी अपडेट समोर
इराण आणि इस्रायलमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे परदेशात अडकलेल्या पुणेकर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पुणे महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत.

इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावामुळे आणि युद्धसदृश परिस्थितीमुळे अनेक भारतीय परदेशात अडकले आहे. युद्धग्रस्त देशात वास्तव्यास असलेल्या पुणेकर नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत पुणे महानगरपालिका (PMC) आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. या ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना सुखरूप परत आणण्यासाठी विशेष मदत कक्ष आणि डेटा बँक सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पुणे महानगरपालिकेची तातडीची पावले
युद्धजन्य परिस्थितीमुळे पुण्यातील नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या आपत्ती व्यवस्थापनाचा भाग म्हणून पुणे महापालिका आयुक्तांनी प्रशासनाला महत्त्वाचे आदेश दिले आहेत. यानुसार पुणे महानगरपालिकेत एक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष २४ तास कार्यरत राहील. नागरिकांना मदतीसाठी तातडीने संपर्क साधता यावा, यासाठी विशेष हेल्पलाईन क्रमांक लवकरच सार्वजनिक केला जाणार आहे.
तसेच युद्धग्रस्त भागात अडकलेल्या पुणेकर पर्यटकांची आणि नोकरी-व्यवसायानिमित्त तिथे असलेल्या रहिवाशांची एक अधिकृत यादी (Data Bank) तयार केली जात आहे. यामुळे केंद्र सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाशी समन्वय साधणे सोपे होणार आहे. तसेच प्रशासनाने नातेवाईकांकडून अडकलेल्या व्यक्तीचे पूर्ण नाव, परदेशातील सध्याचा पत्ता किंवा हॉटेलचा पत्ता, पासपोर्ट क्रमांक आणि स्थानिक संपर्क क्रमांक जमा करण्यास सुरुवात केली आहे.
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये
पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ते २ मार्च या कालावधीत दुबई येथे अडकलेल्या पुण्यातील एकूण १२३ नागरिकांची माहिती प्राप्त झाली होती. जिल्हा प्रशासनाने या सर्व नागरिकांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असून, ते सर्व सुरक्षित असल्याची खात्री पटली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. काही शंका असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या ०२०-२६१२३३७१ किंवा ०२०-२६१३३५२२ या क्रमांकावर संपर्क साधावा.
तसेच परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) संबंधित देशांतील भारतीय दूतावासांचे संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत, जेणेकरून अडकलेल्या नागरिकांना स्थानिक पातळीवर मदत मिळू शकेल. पॅलेस्टाईन (रामल्लाह), कुवेत, बहरीन, मस्कत आणि जॉर्डन येथील भारतीय नागरिकांनाही अत्यंत सतर्क राहण्याच्या आणि दूतावासाच्या संपर्कात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
