‘युद्ध थांबवतो पण…’ इराणच्या राष्ट्रपतींनी PM मोदींसोबत बोलताना ठेवली मोठी अट, डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेकडे जगाचे लक्ष
Iran vs US War : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेशकियान यांच्यात शनिवारी दूरध्वनीवरून चर्चा झाली. यावेळी पेझेशकियान यांनी युद्ध संपवण्यासाठी एक अट ठेवली.

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगाची झोप उडाली आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेशकियान यांच्यात शनिवारी दूरध्वनीवरून चर्चा झाली. यावेळी मोदींनी त्यांना ईद आणि नवरोझच्या शुभेच्छा दिल्या. तसेच इराणच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर झालेल्या हल्ल्यांचा त्यांनी निषेध केला. यावेळी मसूद पेझेशकियान यांनी युद्ध थांबवण्याबाबत भाष्य केले. यावेळी त्यांनी युद्ध थांबवण्यासाठी एक अट ठेवली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
आम्ही युद्धाची सुरुवात केली नाही – पेझेशकियान
इराणी दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी आणि पेझेशकियान यांच्यात झालेल्या चर्चेत द्विपक्षीय संबंधांसोबतच अमेरिका आणि इस्रायलकडून इराणविरुद्ध सुरू असलेल्या लष्करी कारवायांवरही चर्चा झाली. राष्ट्रपतींनी सांगितले की या युद्धाची सुरुवात इराणने केलेली नाही. त्यांनी दावा केला की कोणत्याही वैध कारणाशिवाय आणि सुरू असलेल्या अणु चर्चेदरम्यान इराणवर हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये सर्वोच्च नेते, वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि अनेक निरपराध नागरिक मारले गेले, तसेच सार्वजनिक पायाभूत सुविधांनाही लक्ष्य करण्यात आले.
इस्रायलवर गंभीर आरोप
इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेशकियान यांनी इस्रायलवर आरोप करताना म्हटले की, ‘लेबनॉन, गाझा, इराण, इराक, कतार आणि इतर ठिकाणी होणाऱ्या हल्ल्यांमागे इस्रायलचा हात आहे. इस्रायल सुरक्षा आणि शांततेच्या नावाखाली या कारवायांचे समर्थन करत असले, तरी प्रत्यक्षात तो संपूर्ण प्रदेशात अस्थिरता वाढवत आहे.’ पुढे बोलताना त्यांनी युद्ध थांबवण्याबाबत बोलताना म्हटले की, ‘सर्वप्रथम अमेरिका आणि इस्रायल यांनी तात्काळ आक्रमकता थांबवावी आणि भविष्यात असे पुन्हा होणार नाही याची हमी द्यावी, त्यानंतर आम्ही युद्ध थांबवू.’
युद्ध कोणाच्याही हिताचे नाही
इराणी दूतावासाच्या निवेदनानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऊर्जा पायाभूत सुविधांवर होणाऱ्या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला. त्यांनी होर्मुझच्या सामुद्रधुणीची सुरक्षा आणि फारसी आखातातील नौवहन स्वातंत्र्य राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले. पुढे बोलताना नरेंद्र मोदी यांनी युद्धाचा मार्ग कोणाच्याही हिताचा नाही आणि सर्व पक्षांनी शक्य तितक्या लवकर शांततेच्या दिशेने पावले उचलली पाहिजेत असे आवाहन केले.
