Nepal Flood: नेपाळ आला वठणीवर, आधी भारताला दाखवला होता माज, आता नरमला
Nepal Flood Update: नेपाळमध्ये आलेल्या पूराने सर्वत्र हाहाकार माजला आहे, भारतीय लोकही या पूरामध्ये अडकले आहेत. या पूराचे स्वरुप इतके विध्वसंक होते की सर्व होत्याचे नव्हते झाले, आता या पार्श्वभूमीवर नेपाळने आपली भूमिका बदलली आहे.

Nepal Flash Flood: नेपाळमध्ये विनाशकारी पुर आला आणि एका झटक्यात होत्याचे नव्हते झाले. या विनाशकारी पुरामुळे आतापर्यंत ६७५ लोकांचा मृत्यू झाला आहे. २४९८ लोक अजूनही बेपत्ता असल्याचे वृत्त समोर आले आहे. बेपत्ता लोकांमध्ये ५८९ परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. या पूरामध्ये भारतीय लोकही अडकल्याचे वृत्त समोर आले होते. या कठीण परिस्थितीत नेपाळला मदत करायची असं भारताने आधीच ठरवले होते आणि तशी पाऊलेही उचलली होती, पण तेव्हा नेपाळने भारताची मदत नाकारली होती. आता याच नेपाळने भूमिका बदलली आहे. आता जेव्हा परिस्थितीत हाताबाहेर गेल्याचे दिसत आहे तेव्हा मात्र नेपाळने आपली भूमिका बदलली आहे.
या कठीण काळात भीषण पूर आणि विध्वंसाचा सामना करणाऱ्या नेपाळला भारत सातत्याने सर्वतोपरी मदत करत आहे. नेपाळसाठी ११ टन मदत साहित्य घेऊन जाणारे चौथे भारतीय विमान काठमांडूला पोहोचले आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी एका एक्स-पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, या कठीण काळात भारत नेपाळच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. नेपाळमध्ये विनाशकारी पुराच्या पार्श्वभूमीवर शोध आणि बचाव कार्यासाठी आधी परदेशी मदतीचे प्रस्ताव नाकारले होते. पण आता त्यांनी आपला निर्णय बदलला आहे.
नेपाळचे अग्रगण्य वृत्तपत्र, ‘काठमांडू पोस्ट’नुसार, या विनाशकारी आपत्तीत ज्या देशांचे नागरिक अजूनही बेपत्ता आहेत, त्यांच्या दबावाखाली नेपाळने हा निर्णय घेतला आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते यांनी शुक्रवारी सांगितले, “मदतीचे प्रस्ताव येणे स्वाभाविक आहे. आमच्या सुरक्षा यंत्रणा शोध आणि बचाव कार्य करत आहेत. आम्हाला सध्या अशा मदतीची गरज नाही.” भोटेकोशी नदीच्या पुरामुळे बाधित झालेल्या भागांतील शोध आणि बचाव कार्यासाठी नेपाळ आता आंतरराष्ट्रीय शोध आणि बचाव पथकांची मदत स्वीकारण्यास तयार आहे.
शुक्रवारपर्यंत, बुधवारी भोटेकोशी आणि त्रिशुली नद्यांना आलेल्या अचानक आलेल्या पुरामुळे नेपाळमध्ये ६१६ लोकांचा मृत्यू झाला असून जवळपास २,००० लोक बेपत्ता आहेत. ३२० भारतीय नागरिकही बेपत्ता आहेत. ‘काठमांडू पोस्ट’नुसार, बुधवारी नेपाळ सरकारने सांगितले की “नेपाळी बचाव पथके शोध आणि बचाव कार्य करण्यास सक्षम आहेत. नेपाळ इतर देशांच्या बचाव पथकांना काम करण्याची परवानगी देणार नाही.” पण हा निर्णय जास्त दिवस टिकला नाही. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, प्रशासनाने आता बोगद्यांमधील बचावकार्य, डीएनए चाचणीसाठी परदेशी तज्ञांकडून मर्यादित मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या मूल्यांकनाच्या आधारे, सरकारच्या आंतर-मंत्रालयीन समन्वय समितीने भारत, चीन, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरियाला त्यांचे तज्ञ आणि तंत्रज्ञ पाठवण्यास सांगितले आहे. हे तज्ञ बोगद्यांमधील बचावकार्य, डीएनए चाचण्या करण्याचे काम करतील.
