विविधेतील एकता हाच भारताच आत्मा, सरसंघचालक मोहन भागवतांचा अमेरिकेतून संदेश, धर्माबाबत मोठे चिंतन
RSS Chief Mohan Bhagwat: विविधतेने सजलेली एकता हाच भारताचा आत्मा असल्याचा महत्त्वाचा संदेश सरसंघचालक मोहन भागवत यांनी अमेरिकेतून दिला. अमेरिका ही बहु विविधता तर भारत विविधतेतील एकता असल्याचे ते म्हणाले.

आपण भारतीय म्हणून एक आहोत. विविधतेमुळे ही एकता अधिक सुंदर आणि समृद्ध झाली आहे. विविधता ही नैसर्गिक आहे. एकता हेच सत्य आहे असे महत्त्वाचे चिंतन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे 29 ऑगस्ट रोजी आयोजित युनिव्हर्सल ऑननेस सेलीब्रेशन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून त्यांनी विचार मांडले. भारताच्या ‘विविधेत एकता’ या सूत्राभोवती त्यांनी विचार गुंफले. अमेरिका म्हटले की, बहुविविधता तर भारत म्हटले की विविधतेतील एकता ही संकल्पना समोर येते. एकता आणि विविधता या मूळ भारतीय संस्कृतीतील संकल्पनेवर त्यांनी मत व्यक्त केले. अमेरिकन हिंदूज ऑफ एंगेजमेंट अँड डायलॉग(AHEAD Forum) या संस्थेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
भारताचे ध्येय कोणते?
प्रत्येक राष्ट्राला एक विशिष्ट ध्येय आणि नियती असते. भारताच्या वाट्याला कोणते ध्येय आले आहे? या प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिले. विविधतेतील एकतेचा साक्षात्कार स्वत: करुन घ्यावी आणि वेळोवेळी संपूर्ण जगालाही एकतेची जाणीव करून देणे हेच देशाचे ध्येय असल्याचे भागवत म्हणाले. आपण एक आहोत. विविधतेमुळे ही एकता अधिक सुंदर, समृद्ध झाल्याचे ते म्हणाले. स्वामी विवेकानंद यांचा उल्लेख करत, प्रत्येक राष्ट्राकडे जगाला देण्यासाठी एक संदेश, पूर्ण करण्यासाठी एक ध्येय आणि ते पूर्ण करण्यासाठी नियती असल्याचे सरसंघचालक म्हणाले.
जगा आणि जगू द्या
जगातील काही राष्ट्रांच्या प्रवृत्तींचा उल्लेख केला. जगात दोन प्रवृत्ती असल्याचे ते म्हणाले. जगा आणि जगू द्या हा विचार महत्त्वाचा असल्याचे भागवत म्हणाले. केवळ माझेच खरे आणि त्यांचेच संरक्षण करण्याची प्रवृत्ती संघर्ष निर्माण करते. मानवाने बंधुभावाने जगणे आवश्यक असल्याचे सरसंघचालकांनी सांगितले. जगाला विविधतेतील एकतेची जाणीव करून देणे हे भारताचे दायित्व, जबाबदारी असल्याचे डॉ. मोहन भागवत म्हणाले.
धर्मावर अमेरिकेत मोठे चिंतन
यावेळी संवाद साधताना भागवतांनी धर्मावर मोठे चिंतन केले. धर्म हा सर्वांना जोडणारा असतो. संतुलन ठेवणे आणि समाजात फुट न पडू देण्याचे दायित्व धर्माचे असल्याचे ते म्हणाले. समाजानेच नाही तर प्रत्येक व्यक्तीने जबाबदारी ओळखून इतरांना काहीतरी परत देण्याची भावना ठेवावी असे विचार त्यांनी अधोरेखित केले. त्याचवेळी शेतकरी, कामगार आणि निसर्गामुळे प्रत्येकाला काही ना काही मिळत असल्याची मांडणी त्यांनी केली. पर्यावरण संवर्धनावरही त्यांनी मत मांडले.
उपदेशातून नाही, कृतीतून वारसा
भारताविषयी बोलताना, आता जगाला केवळ उपदेश करून नव्हे तर कृतीतून एकता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश द्यावा असे मोठे वक्तव्य भागवतांनी परदेशातील भूमिवरून केले. परदेशातील भारतीयांनाही त्यांनी मार्गदर्शन केले. कर्मभूमीशी निष्ठा राखत जन्मभूमीतून मिळालेल्या मूल्यांच्या शिदोरीनुसार वर्तन करण्याचे, जगण्याचे आवाहन त्यांनी केले.
रक्षा बंधनाचा कार्यक्रम
या प्रबोधनापूर्वी रक्षा बंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. विविध धर्म आणि समुदायाच्या प्रतिनिधींनी एकमेकांना राखी बांधून या मंचावरून एकतेचा संदेश दिला. या कार्यक्रमात अमेरिकेतील 39 राज्य, 850 शहरातील आणि 29 देशांमधील जवळपास 6 हजार प्रतिनिधींनी सहभाग घेतला. स्थानिक 250 संस्थांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अपार परिश्रम घेतले.
