पाकिस्तानची लायकीच निघाली, जागतिक दहशतवाद निर्देशांकामुळे पितळ उघडं पडलं, बनला सर्वात हिंसक देश
Terrorism Index 2026 : पाकिस्तानमध्ये सतत वाढत असलेल्या दहशतवादी घटनांमुळे आणि अंतर्गत अस्थिरतेमुळे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अशातच आता ग्लोबल टेररिझम इंडेक्समध्ये पाकिस्तानची झोप उडवणारी माहिती समोर आली आहे.

पाकिस्तान हा देश दहशतवादाला खतपाणी घालणारा देश आहे. मात्र पाकिस्तानने आतापर्यंत कधीही हे सत्य स्वीकारलेले नाही. अशातच आता 2026 च्या ग्लोबल टेररिझम इंडेक्स (GTI) मध्ये पाकिस्तानला जगातील सर्वाधिक दहशतवादग्रस्त देश म्हणून घोषित करण्यात आले आहे. या यादीत पाकिस्तानने बुर्किनो फासो, नायजर, नायजेरिया आणि माली यांसारख्या देशांना मागे टाकले आहे. पाकिस्तानमध्ये सतत वाढत असलेल्या दहशतवादी घटनांमुळे आणि अंतर्गत अस्थिरतेमुळे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
दहशतवादी घटनांमध्ये वाढ
ग्लोबल टेररिझम इंडेक्सनुसार, 1 जानेवारी ते 22 मार्च 2026 या कालावधीत पाकिस्तानमध्ये 245 पेक्षा जास्त दहशतवादी घटना नोंदवल्या गेल्या आहेत. यामध्ये ड्युरंड लाईन आणि अफगाणिस्तान सोबतच्या सीमावादाचा समावेश केलेला नाही. याचाच अर्थ पाकिस्तानात अंतर्गत भागात मोठ्या प्रमाणात दहशतवाद वाढत चालला आहे. काही वेळा दहशतवाद्यांनी पोलिस आणि रेल्वेवरही हल्ले केल्याचे समोर आले आहे.
नागरिक आणि सैनिकांचे मोठे नुकसान
यंदाच्या दहशतवादी घटनांमध्ये आतापर्यंत 270 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 410 पेक्षा जास्त पाकिस्तानी सुरक्षा दलातील जवान वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये ठार झाले आहेत. या हल्ल्यांमध्ये दहशतवादी संघटनांसोबतच अफगाण तालिबान आणि बलूच उग्रवादी गटांच्या हालचालींचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. या अहवालात असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे की, जर अशीच परिस्थिती कायम राहिली तर 2026 च्या अखेरीस पाकिस्तानमध्ये 1600 ते 1700 पर्यंत सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू होऊ शकतो. ही पाकिस्तान सरकारसाठी धोक्याची घंटा असणार आहे.
प्रादेशिक तणावावरही लक्ष
पाकिस्तानमधील सुरक्षा परिस्थिती आव्हानात्मक बनली असताना सरकारची नजर प्रादेशिक तणावावर देखील असणार आहे. अधिकारी इराणशी संबंधित परिस्थितीवरही लक्ष ठेवून आहे. वाढत्या दहशतवादी घटना आणि अंतर्गत अस्थिरता पाकिस्तानसाठी मोठे आव्हान बनत आहेत. येणाऱ्या काही महिन्यांत परिस्थिती आणखी बिघडल्यास त्यावर नियंत्रण मिळवणे सरकारसाठी अवघड जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दहशतवादावर वेळीच नियंत्रण मिळवणे सरकारसाठी गरजेचे असणार आहे.
