पाकिस्तानच्या राष्ट्रपतींकडून भारताला जिहादी धमकी
काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानने नाराजी व्यक्त केली. त्यासोबतच पंतप्रधान इमरान खान आणि पाकिस्तानी नागरिकांनीही भारताच्या या निर्णयावर टीका केली होती.
इस्लामाबाद (पाकिस्तान) : काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानने नाराजी व्यक्त केली. यानंतर पंतप्रधान इमरान खान आणि पाकिस्तानी नागरिकांनीही भारताच्या या निर्णयावर टीका केली होती. आता पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनीही भारातला जिहादी धमकी दिली आहे.
“युद्धा सारखी परिस्थिती निर्माण झाली तर पाकिस्तान मागे हटणार नाही”, असं पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी म्हणाले.
आरिफ अल्वी यांनी पाकिस्तानी नागरिकांना सोशल मीडियावर काश्मीरमधील व्हिडीओ टाका, असं आव्हान केलं आहे. तसेच सोशल मीडियावर भारताविरुद्ध युद्ध करण्यासाठी भडकावले आहे. “आम्हाला युद्ध नको आहे. पण भारताने युद्ध केले तर त्यांच्याकडे जिहाद आणि लढण्याशिवाय काहीच राहिलेले नसेल”, असंही अल्वी म्हणाले.
“आज संपूर्ण जग बघत आहे पाकिस्तान काश्मिरी लोकांसोबत उभा आहे. त्यांची साथ देण्यासाठी आम्ही तयार आहे”, असं राष्ट्रपती अल्वी एका कार्यक्रमात म्हणाले. आज पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिवस होता.
दरम्यान, काश्मीरमधून 370 हटवून 9 दिवस झाले आहे. पाकिस्तानने या प्रकरणात अनेक देशांकडे मदत मागितली. पण प्रत्येक ठिकाणाहून निराशा हाती मिळाली. पाकिस्तान समजायला तयार नाही की काश्मीर प्रकरण हे भारतातील अतंर्गत प्रकरण आहे.
भारतात उद्या स्वातंत्र्य दिन आहे. पण पाकिस्तानकडून किंवा दहशतवाद्यांकडून धोका असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे.