Donald Trump : भारत-पाकिस्तानतला तणाव कमी करा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं दोन्ही देशांना आवाहन
Donald Trump On India and Pakistan Attack : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती पाहता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांना तणाव कमी करण्याचं आवाहन केलं आहे.

भारतीय सैन्याने पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशवाद्यांच्या 9 तळांवर एअर स्ट्राईक करत जोरदार दणका दिला. भारताने यात कोणत्याही नियमांचा भंग केला नाही. भारताने फक्त दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्त केले. मात्र दहशतवाद्यांना कायम पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय सैन्याने तो हल्ला परतवून लावला आणि शेजाऱ्यांचे नापाक मनसुबे उधळवून लावले. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’अतंर्गंत ही कारवाई करण्यात आली. मात्र त्यानंतरही पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत आहे. त्यामुळे भारताकडून प्रत्त्युत्तर दिलं जात आहे. तसेच दोन्ही देशात 2 दिवसांपासून हल्ले-प्रतिहल्ले सुरु आहेत. ही युद्धजन्य परिस्थिती पाहून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांना आवाहन केलं आहे.
भारत आणि पाकिस्तानतला तणाव कमी करा, असं आवाहन डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांना केलं आहे. सध्या दोन्ही देशात जोरदार हल्ले आणि प्रतिहल्ले सुरु आहेत. दोन्ही देशात सुरु असलेला हाच तणाव कमी करा, असं ट्रम्प यांनी म्हटलंय. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ नुसार पाकिस्तानवर कारवाई केल्यांनतर आंतरराष्ट्रीय पातळीवरुन अमेरिकेने सर्वात आधी प्रतिक्रिया दिली होती.
डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यरात्री 3 वाजून 10 मिनिटांनी प्रतिक्रिया दिली होती. भारताने ही दहशतवादावर केलेली कारवाई आहे पाकिस्तानवर केलेली कारवाई नाही. त्यामुळे पाकिस्तानने याला उत्तर देऊ नये, असं आवाहन तेव्हा ट्रम्प यांनी केलं होतं. मात्र आता ट्रम्प यांनी दोन्ही देशांना तणाव कमी करण्याचं आवाहन केलंय. तसेच अनेक देशांनी पाकिस्तानला प्रतिहल्ला करु नका, असं सांगितलं होतं. मात्र पाकिस्तानची खुमखुमी त्यानंतरही कमी झालेली नाहीय. त्यानंतर पाकिस्तान सलग दुसऱ्या दिवशी भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र त्यात ते सातत्याने तोंडावर पडत आहेत.
पाकिस्तानच्या कुरापती थांबेना, भारताकडून चोख प्रत्युत्तर
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानमधील कोणत्याही नागरी वस्त्यांवर हवाई कारवाई केली नाही. मात्र पाकिस्तानने कुरापत करणं थांबावलं नाही. घाबरट पाकिस्तानने भारतातील नागरी वस्त्यांवर हल्ला केला. पाकिस्तानने भारताच्या सीमेलगतच्या गावांवर रात्री हल्ले केले. ग्रेनेड आणि ड्रोनद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही त्यांना यात यश आलं नाही. भारतीय सैन्याने आतापर्यंत पाकड्यांच्या प्रत्येक हल्ल्याला जोरदार उत्तर दिलंय. त्यामुळेच पाकिस्तानचा अधिक जळफळाट झाला आहे.